मुंबई : दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी IPS दर्जाच्या महिला अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करून दोषींवर कारवाई करण्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिलं आहे. अटकेत असलेले निलंबित उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार यांना बडतर्फ करून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. 


सोबतच IFS दर्जा असणारे अपर प्रधान मुख्य वनसरंक्षक श्रीनिवासा रेड्डी यांना सहआरोपी करून त्यांनाही अटक आणि बडतर्फ करण्यात यावं असा सूर त्यांनी आळवला आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येऊन नामवंत विशेष सरकारी अभियोक्ता उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
महिला अधिकाऱ्याला वरिष्ठांच्या छळामुळे आत्महत्या करावी लागणे ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला मुळीच शोभादायक नाही असही त्यांनी पत्रात लिहलं आहे.


ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलं, 


'अवघ्या 28 वर्षांच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते, आरोप ज्यांच्यावर आहेत, त्यांची केवळ बदली होते. आंदोलनं झाल्यानंतरच अपर मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांचे निलंबन होते. खरेतर फौजदारी कारवाई सुरू असताना खातेनिहाय चौकशी आवश्यक असते. पण, तसे आदेश न काढता अंतर्गत चौकशी समिती नेमण्याचा घाट. प्रत्येक टप्प्यासाठी आंदोलन. त्याशिवाय सरकार हलत नाही. आम्हाला प्रश्न पडला आहे की, प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव-संरक्षण करण्याचाच या मविआ सरकारचा अट्टाहास का?', असं संतप्त ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी करत महाविकासआघाडी सरकारवर थेट शब्दांत निशाणा साधला. 


ABP Majha Exclusive : आत्महत्या करण्याआधी दीपाली चव्हाण यांचं पतीला भावनिक पत्र






नेमकं काय आहे प्रकरण? 


मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या दीपाली चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात डीएफओ विनोद शिवकुमार या अधिकाऱ्याला अटक केली आहे.