नागपूर : सरकारने वीज कर्मचाऱ्यांना आजच्या आज फ्रँटलाईन वर्कर जाहीर करावे, अशी मागणी भाजप नेते माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. जे वीज कर्मचारी कोरोना काळात रस्त्यावर उतरून, रुग्णालयांच्या आयसीयूमध्ये जाऊन वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांच्या या प्रयत्नांमध्ये अनेक वीज कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा जीवही गेलाय आणि त्याच वीज कर्मचाऱ्यांना सरकार फ्रंटलाइन वर्कर मानायला तयार नाही. हे दुर्दैवी असून सरकारची असंवेदनशीलता दाखवणारी कृती असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.


महाविकास आघाडी सरकारमधील कोणताही मंत्री लोकांच्या प्रश्नांबद्दल गंभीर नाही. विद्यमान ऊर्जा मंत्री नितीन राऊत तर वीज कर्मचाऱ्यांच्या अत्यंत हिताचा मुद्दा कॅबिनेटमध्ये ठेवण्यातही अपयशी ठरले आहेत, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.


फ्रँटलाईन वर्करचा दर्जा मिळावा या मागणीसाठी आज वीज कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले असून लवकरच या मुद्द्यावर अनिश्चितकलीन संपाचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप करत टीका केली आहे.


धान उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भातही महाविकास आघाडी सरकार गंभीर नाही


दुसऱ्या बाजूला विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भातही महाविकास आघाडी सरकार गंभीर नसल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामातील धानाचा बोनस अद्याप देण्यात आलेला नाही. धानावर बोनस देण्याची अनेक वेळा घोषणा करून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी श्रेय लाटले, मात्र बोनस शेतकऱ्यांना आजवर मिळाला नाही याची काळजी मात्र या नेत्यांनी केली नाही. एवढेच नाही तर उन्हाळी धानासाठी अद्याप ही पर्यंत खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे काही दिवसांनी शेतकरी कमी भावात आपला धान व्यापाऱ्यांना विकण्यास मजबूर होतील आणि पुढे तोच धान व्यापारी जास्त समर्थन मुल्यावर सरकारला विकतील अशी शंका ही बावनकुळे यांनी व्यक्त केली.


विद्यमान सरकारमधील नेते धानाच्या खरेदी संदर्भात शेतकऱ्यांचे नाही तर व्यापाऱ्यांचे हित जपत असल्याचे गंभीर आरोप ही त्यांनी केले. पूर्व विदर्भातील धान उत्पादक क्षेत्रातून निवडून जाणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले धान उत्पादक शेतकऱ्यांच्या अशा व्यथेबद्दल गंभीर नाही. उलट ते रोज केंद्र सरकारवर टीका करत असतात नाना पटोले यांनी मोदींवर टीका करण्याऐवजी आपल्या मतदारसंघातील धान उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा पहावी असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला आहे.