सांगली : खंडणी उकळण्यासाठी एका पोलीसानेच त्याच्या 10 वर्षीय आतेभावाचे अपहरण केल्याची घटना इस्लामपूरमध्ये उघडकीस आली आहे. सुनील मोहन कदम असे अपहरण करणाऱ्याचे नाव असून याप्रकरणी इस्लामपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्या तीन साधीदारांपैकी गोपाल हिराप्पा गडदाकी आणि विलास बरमा वरई यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा पोलीस शोध आहेत.


वरदराज खामकर (10) असे या अपहरण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून त्याचा आतेभाऊ सुनील कदमने तीन साधीदारांच्या मदतीने त्याचे अपहरण केले होते. परंतु अपहरणानंतर अवघ्या 36 तासांत पोलिसांनी वरदराजला शोधून काढल्यामुळे इस्लामपूर पोलिसांचे कौतुक होत आहे.

आरोपी सुनील कदम याच्या सांगण्यावरुन त्याच्या तीन साथीदारांनी वरदचे एका खासगी क्लासेससमोरुन अपहरण केले होते. एमएच 15, 8543 या नंबरच्या कारचा अपहरण करण्यासाठी वापर केला होता. परंतु वरदचे अपहरण करताना काही लोकांनी पाहिले होते. ज्या ठिकाणावरुन वरदचे अपहरण झाले. तिथल्या सीसीटीव्ही फुटेजचा वापर करत पोलिसांनी तपास केला.

वरदराजचे वडील मालती वसंतदादा कन्या महाविद्यालयात काम करतात. त्यांनी सोमवारी रात्री त्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली होती. यावेळी त्याचा भाचा (अपहरणकर्ता सुनील कदम) हादेखील त्यांच्यासोबत होता.

सोमवारी सायंकाळी पाच वाजता वरदला गोपाल गडदाकी याने "तुझ्या बाबांनी मला तुला न्यायला पाठविले आहे, असे सांगून त्याला गाडीत बसायला सांगितले. वरदने त्यावर विश्वास ठेवला नाही. त्यावर गोपालने वरदला त्याच्या मोबाईलवर त्याचे वडील बाळासाहेब यांचा आलेला फोनकॉल दाखवला. त्यामुळे तो गाडीत जाऊन बसला.

वरद मोटारीत बसल्यानंतर त्याला त्या तिघांनी मोटारीतून शिये फाटा येथे नेले. जवळच्या बावडा रस्त्यावरील एका हॉटेलच्या खोलीत त्याला कोंडून ठेवले होते. दरम्यान हॉटेलमालकाने हॉटेलच्या नियमानुसार ओळखपत्राशिवाय खोली देणार नाही, असे सांगितले. परंतु सुनीलने आपण पोलीस असल्याचे सांगत हॉटेल मालकावर दबाव आणला.

वरदच्या अपहरणाचा कट रचणारा सुनील कदम हा गडहिंग्लज पोलीस ठाण्यात काम करतो. मामाकडून (वरदच्या वडिलांकडून) लाखो रूपयांची खंडणी उकळण्याच्या उद्देशाने त्याने वरदचे अपहरण केले. रमजान ईदच्या बंदोबस्तात पोलीस व्यस्त असतील आणि मामा पोलिसांत तक्रार करणार नाहीत, असा विचार करुन सुनीलने अपहरणाचा कट रचला होता.

आपण याप्रकरणात अडकतोय हे लक्षात येताच तो मंगळवारी रात्री बेपत्ता झाला होता. बुधवारी त्याला वडणगे या गावातून त्याच्या साथीदारांसह पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात वापरलेल्या गाडीचा नंबरही खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे.