रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 1 जुलै ते 8 जुलै दरम्यान कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याची माहिती उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. ते आज ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलत होते. रत्नागिरीत सध्या कोरोनाचे ॲक्टिव्ह 117 रुग्ण असून ती संख्या शुन्यावर आणण्यासाठी व कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यपातळीवर सर्व संबंधितांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.


रत्नागिरी शहरासह दापोलीतील दोन गावात कोरोना रुग्णांची कोणतीही हिस्ट्री नसल्याने जिल्ह्यात कम्युनिटी स्प्रेड होण्याची शक्यता आहे. त्याबाबत चौकशी सुरू आहे, परंतु सावधानता म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. आठ दिवसांनंतर पुन्हा एकदा परिस्थिती पाहून लॉकडाऊन शिथील करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही उदय सामंत यांनी सांगितले. नागरिकांच्या आरोग्यासाठी हा नाईलाजाने निर्णय घेण्यात आला आहे. याआधी देखील रत्नागिरीतील जनतेने प्रशासनाचे नियम पाळून चांगल्या प्रकारे सहकार्य केले होते. या लॉकडाऊनमध्ये देखील नियम पाळून जनता चांगल्या प्रकारे प्रतिसाद देईल, असा आत्मविश्वास आहे असं उदय सामंत यांनी सांगितलं.


रत्नागिरी जिल्ह्यातील मृत्यूंची संख्या वाढत असल्याने आता टास्क फोर्सची देखील स्थापना करण्यात येत असून मुंबई पुण्यात असलेले प्लाझ्मा थेरपी आता रत्नागिरीतही सुरू करण्यात येणार असून त्याद्वारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. ऑपरेशन ब्रेक द चेन बाबत बोलताना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले की, नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. 1 जुलै ते 8 जुलै असा कडक लॉकडाऊन सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहणार आहे. यावेळेत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात येणार असून जिल्ह्याच्या सीमा पूर्णपणे बंद राहणार आहेत.


या काळात सर्व दुकाने, चारचाकी वाहने, दुचाकी वाहने ,रिक्षा आदींना पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने, दवाखाने पशुवैद्यकीय दवाखाने व तर अत्यावश्यक गोष्टी सुरू राहतील. या काळात खासगी ऑफिसेस देखील पूर्णपणे बंद राहणार असून सरकारी कार्यालयात फक्त 10 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. बँका व पोस्ट सेवा सुरू राहणार आहेत. तसेच कृषी संबंधीचे दुकाने सुरू राहणार आहेत. सध्या संध्याकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत पूर्णपणे कर्फ्यू राहणार असून फक्त वैद्यकीय कारणांसाठी नागरिकांना बाहेर पडता येणार आहे. हा लॉकडाऊन मंगळवारी रात्री 12 वाजेनंतर किंवा बुधवारी सकाळपासून सुरू करण्यात येणार आहे.


CM Uddhav Thackeray | 30 तारखेनंतर लॉकडाऊन उठणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे