रत्नागिरी : कोरोना व्हायरसशी लढणाऱ्या सर्वांसाठी तब्लिगी जमातीच्या मरकजमध्ये सहभागी झालेले लोक चिंतेचा विषय ठरत आहेत. तब्लिगी जमातीच्या मरकजमध्ये सहभागी झालेल्या अनेक लोकांना कोरोना झाल्याचं निष्पन्न होत असून त्यामुळे देशातील कोरोनाचा ग्राफ सतत वाढत आहे. राजधानी दिल्लीतील निजामुद्दीन या भागाला कोरोना हॉटस्पॉट म्हणून देखील घोषित करण्यात आले. याच ठिकाणी रत्नागिरीतील सात जण गेल्याची बाब आता समोर आली आहे. जिल्हा प्रशासनानं याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. यापैकी एक रूग्ण हा कोरोनाबाधित असल्याचे आता रिपोर्टमधून समोर आले आहे. रत्नागिरीतील या रूग्णावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.


जिल्हा रूग्णालयात मरकजला गेलेले 5 जण क्वॉरन्टाईन करून ठेवण्यात आले आहेत. या 5 जणांपैकी एकाचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. तर, एक मुंबई आणि एकाला आग्रा या ठिकाणी क्वॉरन्टाईन करून ठेवण्यात आले आहे. मिरकजला गेलेल्या एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधिताची संख्या ही पुन्हा एकवर आली आहे.
दरम्यान कोरोनामुळे देशात सध्या लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. त्यानंतर देशात शेकडो रूग्ण हे कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सरकारी, प्रशासकीय पातळीवर देखील याबाबतची सारी खबरदारी घेतली जात आहे. लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे.

Rural News | माझं गाव माझा जिल्हा | राज्याच्या कानाकोपऱ्यातील बातम्यांचा आढावा


कोरोनारुग्ण आढलेला परिसर 3 किमीपर्यंत करणार सील

कोरोनाबाधित आलेला व्यक्ति हा रत्नागिरीतील राजीवडा येथे राहतो. 18 मार्च रोजी हा व्यक्ति मरकजहून रत्नागिरीमध्ये आला होता. तेव्हापासून तो अनेकांच्या संपर्कात आला आहे. या साऱ्यांची आता टेस्ट केली जाणार आहे. शिवाय, खबरदारीचा उपाय म्हणूव पुढील 15 दिवस  3 किलोमीटरपर्यत हा परिसर सील केला जाणर आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे देखील यावेळी हजर होते. तर, परिसर सील करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी घाबरण्याचं कारण नाही. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी केले आहे.

रत्नागिरीतील कोरोना रुग्णाची ट्रॅव्हल हिस्ट्री?

रत्नागिरीतील कोरोनाबाधित सापडलेली व्यक्ति हा मुळचा रत्नागिरीतील रहिवाशी नाही. दिल्ली-मुंबई आणि त्यानंतर रत्नागिरी असा प्रवास करत सदर व्यक्ति 18 मार्च रोजी रत्नागिरीमध्ये कोचिवेल्ली एक्सप्रेसनं दाखल झाला. त्यामुळे 16 मार्च ते 19 मार्च याकाळात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी दाखल झालेल्या लोकांवर देखील लक्ष ठेवले जाणार आहे. या व्यक्तिसोबत सिंधुदुर्ग येथे 24 जण, चिपळूण येथे 10 आणि रत्नागिरी येथे 17 जण उतरले. त्यासर्वांची देखील आता चौकशी करत वेळ पडल्यास त्यांना क्वॉरन्टाईन केले जाणार आहे.

मुंबई, पुणेहून आलेल्या नागरिकांना आवाहन

मागील काही दिवसात ज्या व्यक्ति मुंबई आणि पुण्याहून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये दाखल झाल्या आहेत त्यांनी समोर यावं. कुणीही घाबरण्याचं कारण नाही. व्यक्ति स्वत:हून समोर न आल्यास त्यांना आश्रय देणाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. तर, नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.

'...अन्यथा एसआरपीला बोलवू'

सध्या प्रशासन जी काही पावलं उचलत आहे ती योग्य आहेत. त्यांना सहकार्य करा. नागरिकांनी समोर यावं. परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी. सध्या रस्त्यावर पोलीस आहेत. पण, वेळ पडल्यास एसआरपीला देखील पाचारण केले जाईल. त्यानंतर मात्र परिस्थिती वेगळी असेल. अशी माहिती देखील यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी दिली.