मुंबई : काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने कोरोना बाधितांची संख्या कमी करण्यात यशस्वी ठरलेल्या मुंबई पॅटर्नचं कौतुक केलं होतं.  हाच मुंबई पॅटर्न महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची सतत वाढती संख्या असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. राज्यात 36 पैकी 15 जिल्हे असे आहेत जिथे बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 


 महाराष्ट्रातील 36 पैकी तब्बल 21 जिल्ह्यांमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही 1 टक्क्यांपेक्षाही खाली आलीय. महाराष्ट्रातील जनतेसाठी ही नक्कीच आनंदाची बाब आहे मात्र दुसरीकडे 15 जिल्ह्यांमध्ये मात्र चिंताजनक परिस्थिती असल्याचं चित्र आहे. कारण त्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांच प्रमाण हे 2.2 टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे यावर उपाय योजना करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. 


नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या 15 जिल्ह्यांचा आढावा घेत या जिल्ह्यात मुंबई पॅटर्न राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पॅटर्ननुसार तत्काळ बाधित रुग्णांचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आपोआपच रुग्णांचा लवकर शोध लागून त्यांच्यावर वेळीच उपचार करणं प्रशासनाला शक्य होणार आहे. परिणामी रुग्ण लवकर बरे होतील आणि वाढणारा मृत्यूदर देखील कमी होईल असा विश्वास महसूलमंत्र्यांना आहे.


कोरोनाबाधितांची संख्या जास्त असणारे प्रमुख जिल्हे आणि प्रमाण


जिल्हे          प्रमाण


रत्नागिरी       2.2 %


सिंधुदुर्ग         2.1 %


कोल्हापूर       1.7 %


सोलापूर         1.6 %


बुलडाणा          1.5 %


   ग्रामीण भागात आता खरीपाचा हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळे शेतकरी एकत्र येण्याची शक्यता जास्त आहे. शिवाय मागील लाटेत मोठ्या प्रमाणात लग्न कार्य पार पडल्यामुळे आता या लाटेत आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये. गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळलं जावं. यासाठी पोलीस महासंचालकांनी खासकरुन या 15 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा केली असून गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवून राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासोबतच ग्रामरक्षक दल तयार करुन गर्दी होऊ नये यासाठी त्यांच्यावर जबाबदारी देण्याच्या देखील सूचना दिल्या आहेत


मंडळी एकीकडे 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांतील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त होत असताना दुसरीकडे उर्वरीत 21 जिल्ह्यांमधील परिस्थिती मात्र सुधारताना पाहिला मिळत आहेत. कारण या 21 जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढीचा दर हा 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. हा दर 0 टक्के होण्यास बरीच वर्षे लागू शकतात असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. नुकताच जळगाव जिल्ह्याने मुंबई पॅटर्नचा वापर करुन आपल्या जिल्ह्यातील बाधितांचा दर घटवला आहे. त्यामुळे इतर 15 जिल्ह्यात देखील बाधितांची संख्या लवकरच कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.