Coronavirus in Maharashtra Live Update | मुंबईत येत्या आठ तारखेपासून बेस्ट बस सेवा पूर्ववत होणार

राज्यात शुक्रवारी ( 05 जून ) 1475 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 35 हजार 156 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. शुक्रवारी कोरोनाचे नवीन 2436 नवे रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 80 हजार 229 इतका झाला आहे. पैकी सध्या 42 हजार 215 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील मुंबई, पुण्यासह आता मालेगाव आणि औरंगाबाद ही कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. या शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. कोरोना व्हायरसविषयी सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडी आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Jun 2020 06:21 PM

मुंबईत 8 जून पासून बेस्ट पूर्ववत होणार आहे. अत्यावश्यक सेवांसोबतच इतर नागरिकांसाठीही बेस्ट सुरु होणार आहे.

राज्य शासनाच्या मिशन बिगीन अगेन मधील तीन टप्प्यातील नियमावलीनुसार पुढील वर्गातील व्यक्ती बेस्टनं प्रवास करु शकणार आहे.

1. अत्यावश्यक सेवांचे कर्मचारी (आधीही प्रवास करत होते)
2. सरकारी कार्यालयातील कर्मचारी
3. खाजगी कार्यालयातील कर्मचारी
4. दुकानदार
5. प्लंबर, इलेक्ट्रीशिअन अशा सुविधा देणाऱ्या कामगार वर्गाला प्रवास करता येणार आहे.

एका सीट वर एक प्रवासी अशा रितीने 30 प्रवासी बेस्टमधून प्रवास करतील

तर 5 प्रवाशांना उभं राहून प्रवास करण्याची परवानगी असणार आहे.


औरंगाबाद : हर्सूल जेलच्या 29 कैद्यांना लागण, जेल 100 लॉक डाऊन केलेले, नवा कैदी जेलमध्ये जातात त्याची टेस्ट केली जाते, मग आतील कैद्यांना कसा कोरोना झाला हा प्रश्न
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 90 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, 21 महिला आणि 69 पुरुष रुग्णांचा समावेश, एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1936 वर, यापैकी 1154 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 96 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू,आता 686 रुग्णांवर उपचार सुरू
सोलापूर : सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात आणखी 30 रुग्णांची वाढ, मृतांच्या संख्येत मात्र वाढ नाही, आतापर्यंत शहरातील एकूण बाधितांची संख्या पोहोचली 1107 वर, तर शहरातील मृतांची एकूण संख्या 94, मागील 24 तासात शहरातील 88 रुग्ण बरे होऊन घरी परतले, आतापर्यंत शहरातील 567 रुग्णांना डिस्चार्ज, उर्वरित 446 रुग्णांवर उपचार सुरू
इंदापूर शहरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोनामुक्त झालेल्या इंदापूरमध्ये पुन्हा कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. सोलापूरमध्ये वास्तव्य असलेल्या आणि इंदापूर शहरात एक दिवस मुक्काम केलेल्या नागरिकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याच्यावर पुण्यातील खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहे. त्याच्या संपर्कातील 19 जणांचे स्वॅब घेतले आहेत. इंदापूरकरांनी घाबरुन न जाता प्रशासनाच्या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. इंदापूर तालुक्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या सहा झाली असून त्यापैकी चार जण बरे झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे.
नाशिकच्या ग्रामीण भागात कोरोनाचं थैमान वाढलं आहे. आज आलेल्या अहवालात मनमाडमधील 11 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. यात 5 आणि 7 वर्षांची मुलगी आणि 6 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. मनमाडमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 40 वर पोहोचली असून त्यात 11 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पुणे : पुण्यात रात्रभरात 41 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, पुण्यातील रुग्णांची संख्या 9006 वर तर आत्तापर्यंत 401 कोरोना बाधितांचा मृत्यू
धुळे जिल्ह्यात आणखी 11 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात तीन डॉक्टर, एक आरोग्य कर्मचाऱ्याचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 215 वर गेली आहे.
कोरोनाचे संकट महाराष्ट्रावर घोंगावत असताना वटपौर्णिमेचे पूजन करण्यासाठी ठाणे येथील पंचगंगा सोसायटीमधील महिलांनी सोसायटी मधेच वटपौर्णिमा साजरी केली.
1 जूनपर्यंत राज्यातील जवळपास 12 लाख स्थलांतरित मजूर आपल्या राज्यात सुखरुप परतल्याची माहिती राज्य सरकारच्यावतीने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. टाळेबंदीच्या काळात आपापल्या राज्यात परतण्यासाठी आतुर असलेल्या स्थलांतरित मजूरांची घरी परतण्याची मागणी श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली असून त्यांच्या कोणत्याही मागण्या आता प्रलंबित नाहीत असंही हायकोर्टात सांगण्यात आलं आहे.
धुळे जिल्ह्यात आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह. रुग्णसंख्या 204 वर. धुळे शहरातील तिघांचा तर शिरपूर मधील एका रुग्णाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. धुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यानं नागरिक, प्रशासनाची चिंता वाढलीय.
पिंपरी चिंचवड शहरात आज 45 रुग्णांना कोरोनाची लागण, दोघांचा मृत्यू तर 44 रुग्णांना डिस्चार्ज. शहरात 678 कोरोना रुग्णांची नोंद तर 401 रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज.
औरंगाबाद कोरोनामुळे रहेमानिया कॉलनी भागात राहणाऱ्या 34 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. औरंगाबादमध्ये आतापर्यंत 94 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
गोंदियात आज एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नसून एकूण रुग्ण संख्या 69 इतकी आहे. तर 17 रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत. दोन रुग्ण बरे होऊन घरी गेलेत.
वरळीतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी महानगर पालिका आणि वन रुपी क्लिनिकच्या माध्यमातून मेडिकल कँपचं आयोजन दाट वस्ती भागात करण्यात येतं आहे. कँपच्या माध्यमातून नागरिकांची ऑक्सिजनची पातळी, शरीराचं तापमान तसेच ताप, थंडी, खोकला यासारख्या आजारांवर औषधोपचार करण्यात येतं आहे. आत्तापर्यंत अशा प्रकारचे जवळपास 50 मेडिकल कँप वरळी मतदार संघात करण्यात आलेले आहेत. यातून ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळत आहेत. त्यांना तत्काळ दवाखान्यात दाखल करण्यात येतं आहे.
फोर्ब्जने जारी केलेल्या १०० सर्वाधिक मानधन असलेल्या जगभरातल्या कलाकरांमध्ये अक्षयकुमार या एकमेव भारतीय कलाकाराचा समावेश झाला आहे. अक्षय ५२ व्या स्थानी अशून गेल्या वर्षात अक्षयने कमाई केली ती तब्बल ४८ मिलियन डॉलर्सची. विल स्मिथ, जेनिफर लोपेझ यांनाही त्याने मागे टाकलं आहे. गेल्या वर्षीच्या मिळकतीवरची ही यादी आहे. या यादीत पहिल्या १० मध्ये रॉजर फेडरर, मेसी आहेत. ५९० मिलियन डॉलर्स कमाई करून केली जेनर पहिल्या स्थानावर आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक, परस्पर गैरहजर राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार, आठवड्यातून एक दिवस हजर न राहिल्यास संपूर्ण आठवड्याची गैरहजेरी लागणार , राज्य सरकारचे सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी आदेश जारी, 8 जून पासून होणार अंमलबजावणी
नागपूरात आज 6 कोरोना बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 632 झाली आहे, आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 1 हिंगणा रोड परिसर, 1 लकडगंज, 1 सेमीनेरी हिल्स परिसरातला आहे, तर 1 रुग्ण नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून म्हणजेच बाजारगावचा आहे, तर उर्वरित दोघे नागपूर बाहेरून उपचारासाठी नागपुरात आलेले रुग्ण आहेत, आतापर्यंत 12 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 412 रुग्ण कोरोनापासून मुक्त झाले आहे, पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये घट होण्यास सुरुवात झाली आहे
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद, राज्यात सर्वाधिक कोविडचे रुग्ण आढळले आहेत, पहिल्या दिवसापासून व्हायरस विरुद्ध चांगला लढा देत आहोत, त्याबाबत समाधानी आहे, हा लढा खरा रुग्णालयाबाहेर आहे, या विषाणूचा प्रसार कमी करण्याबाबत आपल्याला पावलं उचलायची आहेत. पुण्यामध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. कोविड 19 विरिद्ध शासकीय आणि खाजगी व्यवस्था शासन उपलब्ध करत आहे. या आपत्तीचे व्यवस्थापन योग्य प्रकारे सुरु आहे. चार लॅब पासून सुरु झालेल्या लॅब ची संख्या आता 80 लॅब वर आली आहे, अशी माहिती मंत्री देशमुख यांनी दिलीय
नांदेड : कोरोनाचे आज 7 नवे रुग्ण आढळले, सहा जण नांदेड शहरातील नई आबादी भागातील रहिवाशी, 1 जण माहूर तालुक्यातील पलाईगुडा येथील रहिवाशी, नांदेडची रुग्णसंख्या पोहोचली 181 वर, आजवर आठ जणांचा बळी गेला.
हिंगोलीमध्ये आज पुन्हा नवे 6 रुग्ण आढळून आले. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 192 वर पोहोचली आहे. तर कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 161 इतकी आहे. सध्या 31 रुग्ण उपचार घेत आहेत.
नागपूर : अडीच महिन्यानंतर नागपूरात बाजार सुरु झाल्याने व्यापारी आनंदित झाले आहेत. खूप नुकसान झाले असले तरी आजपासून कामाला पुन्हा सुरुवात करत असल्याचा आनंद असल्याची व्यापाऱ्यांची भावना आहे. दरम्यान, महापालिकेने सम आणि विषम तारखेबद्दल दिशेच्या अनुषंगाने दिलेले निर्देश स्पष्ट नसल्याने अनेक व्यापारी गोंधळले आहेत. नागपुरात लक्ष्मीभुवन चौकावर दोन्ही बाजूच्या दुकानं सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे महापालिकेने एकतर दोन्ही बाजुची दुकानं उघडण्याची परवानगी द्यावी, किंवा निर्देशात स्पष्टता आणावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. शिवाय सकाळी 9 ते 5 ऐवजी सकाळी 10 ते संध्याकाळी 7 अशा वेळेत दुकानं उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.
सोलापूर : जवळपास 75 दिवसांपासून बंद असलेल्या सोलापुरातील बाजारपेठा आज पुन्हा सुरु होताना पाहायला मिळत आहेत. मिशन बिगन अगेनच्या दुसऱ्या फेजमध्ये रेड झोनमधील दुकांनाना देखील काही नियम आणि अटी घालून सुरु करण्याची परवानगी शासनाने दिलीय. त्यामुळे आज सकाळपासूनच सोलापुरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या नवी पेठ परिसरात व्यापाऱ्यांची लगबग पाहायला मिळाली. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सम आणि विषम तारखेस कोणती दुकाने सुरु राहतील, याबाबात नवी पेठ व्यापारी असोशिएशनने नकाशा तयार केला. त्यानुसारच आजपासून व्यापारी आपली दुकाने उघडणार आहेत. यामध्या कॅशलेश व्यवहार करण्यावर व्यापारी आणि नागरिकांनी भर द्यावा अशा सुचना महापालिकेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. दरम्यान अनेक दिवासांपासून बंद असलेली दुकांनामध्ये सकाळपासून व्यापारी साफसफाई करताना दिसुन आले. ल़ॉकडाऊनच्या कालावधीत लाखोंचे व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे आज सुरु होणाऱ्या बाजारपेठांमुळे व्यापाऱ्यांमध्ये देखील उत्साहाचे वातावरण आहे.
लॉकडाऊनच्या काळात मुंबईतील सर्व गॅरेजस बंद होते. आता ही सर्व गॅरेज तब्बल 75 दिवसांनंतर सुरू करण्यात आली आहेत. ही गॅरेजस सुरू करताना गॅरेज मालकांना काही सूचना महापालिकेच्या वतीने देण्यात आल्या आहेत. यात गाडी दूरुस्ती आणणाऱ्यांना प्रथम अपॉइमेंट घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यासोबतच गॅरेजमध्ये ठराविक स्टाफ ठेवणे, प्रत्येकाने मास्क आणी सँनिटायझरचा वापर करणे, आशा सूचना देण्यात आल्या आहेत.
औरंगाबादमध्ये आजपासून बाजारपेठ सुरू झाल्या आहेत. सरकारच्या सगळ्या नियमांचे पालन करून अटी शऱ्थींसह या बाजारपेठ सुरू झाल्या. दुकानदारांना पोलिसांनी सूचना केल्या आहेत. दुकानात गर्दी होणार नाही याची काळजी देखील दुकानदारांना घ्यायची आहे. व्यापारीही सूचना पाळत आहेत. मात्र, यापुढं बऱ्याच अंशी आता नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे. दुसरीकडे कोरोनाचं संकट देखील वाढत आहे. आज सकाळी 59 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 59 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, यामध्ये 19 महिला आणि 40 पुरुष रुग्णांचा समावेश, औरंगाबादेत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1828 वर, यापैकी 1126 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी, 93 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू, 609 रुग्णांवर उपचार सुरू, नेहरू नगर, कटकट गेट येथे राहणाऱ्या 30 वर्षीय गरोदर कोरोनाबाधित महिलेचा चार जून रोजी दुपारी दोन वाजता मृत्यू
मुख्यमंत्री कोकणात तर उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर, मावळ,जुन्नर इथे पावसाने झालेल्या नुकसानीची आज पाहणी करणार, उद्या पुण्यात आढावा बैठक होणार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आले असून उद्या अलिबागच्या दौऱ्यावर जाणार आहेत. निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा असणार आहे. सर्व अधिकारी, पालकमंत्री आणि आमदारांसोबत यावेळी चर्चा करणार. उद्याच्या दौऱ्यात नुकसान झालेल्यांसाठी मोठ्या घोषणेची शक्यता.
कोल्हापूरमध्ये आरोग्य निरीक्षकास नगरसेवकाची शिव्या देत मारहाण. आरोग्य निरीक्षक नंदू पाटील यांना नगरसेवक श्रावण फडतारे यांची मारहाण. प्रभागातील कामावरून शिवागीळ करत मारहाण केल्याची माहिती. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल.
सोमवारपासून दादर परिसरातील दुकाने सुरु करण्याबाबत प्रशासनाची तयारी सुरु. एकदिवसाआड समविषम तारखांचं सूत्र वापरुन दुकाने सुरु करण्यास परवानगी मिळणार आहे. मात्र, शॉपींग हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादरमध्ये दुकाने सुरु केल्यानंतर गर्दी होणार नाही याकडे प्रशासनाचे विशेष लक्ष. याकरता व्यापारी संघटनांसोबत बैठक घेऊन प्रशासनाकजून संबंधित सूचना दिल्या जाणार. मुंबईतील इतर ठिकाणीही समविषम तारखांच्या सूत्रानं एकदिवसाआड रस्त्याच्या एका बाजूची दुकाने पूर्णवेळ सुरु होणार. दुकाने सुरु केल्यास सोशल डिस्टन्सिंग पाळले जाण्याची संपूर्ण जबाबदारी दुकानदारांवर असणार आहे. तसेच, ट्रायल रुम, एक्चेंज/रिटर्न पॉलिसीला परवानगी नसेल.
रायगड जिल्ह्यात काही लाख घरांचे नुकसान, विजेचे हजारो खांब उन्मळले, महावितरणाने युद्धस्तरावर जिल्ह्यात वीज पुरवठा सुरळीत करावा; नागरिकांना अन्नधान्य पुरविण्याचे, तातडीने पंचनाम्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस : निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यात विशेषत: कोकणातील जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी, मासेमार, फलोत्पादक, छोटे दुकानदार, मूर्तिकार यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेकांच्या घरांचे पत्रे उडून गेल्याने घरांचे आणि घरातील सामुग्रींचे मोठे नुकसान झाले आहे.

राज्य सरकारने सर्वत्र तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी. पुणे, नाशिक, मालेगाव या भागात सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. शेतमाल खरेदी होत नसल्याने आधीच शेतकरी त्रस्त आहे. आता प्रत्यक्ष हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे तातडीने नुकसानभरपाई द्यावी, ही राज्य सरकारला विनंती.
शरद पवारांनी घेतला निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा व मदतकार्याचा आढावा, उपमुख्यमंत्री अजित पवार,जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे होते उपस्थित
मुंबई : पवई हिरानंदानी येथील एस प्रभागाच्या हद्दीत असलेल्या विलगीकरण कक्षामध्ये दुपारी नागरिकांना दिलेल्या जेवनामध्ये अळ्या सापडल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या सेंटरमध्ये आज दुपारच्या जेवनामध्ये वरण ,भात ,भाजी हा मेनू देण्यात आला होता. यावेळी सेंटरमध्ये असलेल्या काही महिलांना जेवताना त्यांच्या प्लेटमध्ये असलेल्या वरणामध्ये या अळ्या दिसून आल्या. यासंदर्भात त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना याची तक्रार दिली. परंतु अद्यापही या घटनेची कुठलीच दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे या सेंटरमध्ये मिळत असलेल्या जेवणाच्या दर्जाबाबत नागरिकांनी सवाल उपस्थित केले आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन त्याची चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कार्यवाही करण्याची मागणी आता केली जात आहे.
नागपूर: नागपुरात आज कोरोनाचे 12 रुग्ण वाढले असून कोरोना रुग्णांची एकूण संख्या 625 झाली आहे, आज वाढलेल्या रुग्णांपैकी 9 रुग्ण टिमकी / भानखेडा परिसरातले आहेत, तर मोमीनपुरा मधील 1 रुग्ण आहे, तर उर्वरित दोघे अकोला येथून उपचारासाठी आले होते. नागपुरात आतापर्यंत 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 406 रुग्ण कोरोनामुक्त ही झाले आहे
अमरावती येथील रुक्मिणीनगर परिसरातील 65 वर्षीय पुरुष व्यक्तीचा नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज पहाटे सहा वाजता मृत्यू झाला. सारी आजार असल्याने ते नागपूरला दाखल होते. 2 जूनला नागपूरला त्यांचा swab घेण्यात आला. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना 3 जूनला कोविड वॉर्डमध्ये हलविण्यात आले. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.

सोलापुरात आज सकाळी प्राप्त अहवालात 55 जण कोरोना पॉझिटिव्ह, काल संध्याकाळनंतर 261 जणांचे अहवाल प्राप्त, त्यापैकी 206 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 55 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, सोलापुरात एकूण बाधितांची संख्या पोहोचली 1135 वर, आतापर्यंत 94 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, तर 469 रुग्ण बरे होऊन घरी परतले
सांगली जिल्ह्यात आणखी 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्ण संख्या 128 वर पोहोचली आहे. सध्याच्या घडीला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 51 असून 73 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळी वारे वाहत असतानाच बीडच्या सिरसाळा परिसरामध्ये मागच्या आठवडाभरापासून कापूस भरलेली वाहनं रांगेत उभा आहेत. रविवारी या परिसरातील जिनिंगवर कापसाची खरेदी झाली त्यानंतर पावसाचं कारण सांगत ती खरेदी बंद करण्यात आली. मात्र जी वाहनं रस्त्यावर लागली होती त्यातली कोणतीही वाहनं हललेली नाहीत. रस्त्याच्या कडेला किमान दोन ते तीन किलोमीटर अशा वाहनांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. दोन जिंनिग वर किमान तीनशे पेक्षा जास्त वाहन पावसात उभी आहेत. सीसीआयकडून ही खरेदी सुरू होती मात्र अचानक खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांनी आता हा कापूस कुठं घेऊन जायचा असा प्रश्न निर्माण झालाय.
कोरोना संकटाच्या काळात लोकांच्या आर्थिक अडचणींमध्ये आधीच वाढ झालेली असताना सायबर गुन्हेगार नवनव्या युक्त्या शोधून लोकांची फसवणूक करत आहेत. नागपुरात अशाच एका प्रकरणात सायबर गुन्हेगारांनी अख्ख्या कुटुंबाचे बँक खाते साफ केल्याचे समोर आले आहे. एका ओटीपी नंबर वरून कुटुंबातील चार खात्यातून लाखो रुपये लंपास झाल्याने पोलिसांचे सायबर सेल ही चक्रावून गेले आहे. नागपूरात गुन्हा दाखल झाला असून सायबर गुन्हेगाराचा फोन बिहार मधून आल्याचे स्पष्ट झाले आहे.
सातारा : सात रुग्णांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह, साताऱ्यात कोरोना बाधितांचा आकडा 578 वर, आजपर्यंत 24 बाधितांचा मृत्यू, आजपर्यंत 235 रुग्ण बरे होऊन गेले
नाशिक जिल्ह्यातील 14 रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील मालेगावात 8, ओझरमध्ये 1, येवल्यात 1, 4 इतर भागांतील रुग्णांचा समावेश आहे.
पुण्यात रात्रभरात 31 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, पुण्यातील रुग्णांची संख्या 8505 तर आत्तापर्यंत 378 कोरोना बाधितांचा मृत्यू, एकूण डिस्चार्ज रुग्णांची संख्या 5203 वर
आरोग्यमंत्री राजेश टोपे आज अकोल्यात कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अकोल्यात आले होते. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता कार्यालयात बैठक घेतली. मात्र, जनतेला फिजीकल डिस्टंसिंग पाळण्याचं आवाहन करणाऱ्या आरोग्यमंत्र्यांना स्वत:च ते पाळण्याचं भान राहिलं नाही. या बैठकीत अधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार यांची मोठी गर्दी झाली आणि फिजिकल डिस्टसिंगचा पार बोजवारा उडाला.
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 63 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, 26 महिला आणि 37 पुरुष रुग्णांचा समावेश, औरंगाबाद कोरोनाबाधितांची संख्या 1767 वर, 1113 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 89 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू, आता 565 रुग्णांवर उपचार सुरू

पुण्यात काल दिवसभरात 340 नवीन कोरोना रुग्णांची नोंद तर 11 कोरोना बाधितांचा मृत्यू, पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या 8474 तर आत्तापर्यंत 378 रुग्णांचा मृत्यू, 5203 जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आलंय.

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात शुक्रवारी ( 05 जून ) 1475 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 35 हजार 156 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. शुक्रवारी कोरोनाचे नवीन 2436 नवे रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 80 हजार 229 इतका झाला आहे. पैकी सध्या 42 हजार 215 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


कोरोना चाचणीच्या शुक्रवारपर्यंत पाठवण्यात आलेल्या 5 लाख 22 हजार 946 नमुन्यांपैकी 80 हजार 229 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात 5 लाख 45 हजार 947 लोक होम क्वॉरंटाईन आहेत. तर संस्थात्मक क्वॉरंटाईन (Institutional Quarantine) सुविधांमध्ये 72 हजार 315 खाटा उपलब्ध असून सध्या 30 हजार 291 रुग्ण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये दाखल आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.