मुंबई : राज्यात आज 3752 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.49 टक्के एवढा आहे. राज्यात आज 1672 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत एकूण 60 हजार 838 रुग्णांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 53 हजार 901 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.


राज्यात 100 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. यासह आतापर्यंत 5751 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईत 67, भिवंडी 27, ठाणे 4, वसई विरार 1, नागपूर मनपा येथील एकाचा मृत्यू झाला आहे.


राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार आज झालेल्या मृत्यूंमध्ये 66 पुरुष आणि 34 महिला आहेत. यात 60 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे 45 रुग्ण, 40 ते 59 वयोगटातील 46 रुग्ण आणि 40 वर्षाखालील नऊ रुग्णांचा समावेश आहे. 13 मृतांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदान, हृदयरोग असे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.


राज्यात सध्या 55 शासकीय आणि 43 खाजगी अशा एकूण 98 प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत 7 लाख 17 हजार 683 नमुने प्रयोगशाळांत पाठवण्यात आले असून त्यातील 1 लाख 20 हजार 504 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 81 हजार 650 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये तर 26 हजार 740 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.


MNS | मनसेनं मदत केलेल्या कोरोनाबाधित महिलेला कन्यारत्न, कन्येची जबाबदारी महिला पदाधिकाऱ्याकडे