Corona News Update : राज्यात कोरोना वाढत असतानाचा एच3एन2 रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे सध्या ही चिंतेची बाब समोर आली आहे. वाढती कोरोना रूग्णांची संख्या आणि एच3एन2 रुग्णांची पाहता केंद्राने राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.  


राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. सोबतच एच3एन2 च्या रुग्णांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यानं चिंतेचा विषय ठरत आहे. 8 मार्चपासून राज्यात दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या चाचण्या, बूस्टर डोस आणि नियमावलीचे पालन करण्याच्या सूचना केंद्राकडून राज्यांना देण्यात आल्या आहेत. 


राज्यात काल 226 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातील कोव्हिड ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 900 पार झाली आहे. महाराष्ट्रात 8 मार्चपर्यंत आठवड्यात 355 कोरोनाच्या रूग्णांची नोंद झाली.  परंतु 9 ते 15 मार्च दरम्यान 688 रूग्ण आढळून आले आहेत. गुजरातमध्ये गेल्या दोन आठवड्यांत संसर्गाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात तेथे 279 प्रकरणे आढळून आली आहेत. तेलंगणामध्ये कोरोनाचा संसर्ग दर 0.31 टक्के, तामिळनाडूमध्ये 1.99 टक्के, केरळमध्ये 2.64 आणि कर्नाटकमध्ये 2.77 टक्के नोंदवला गेला आहे. त्यामुळे या राज्यांनी खबरदारी घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 


 एच3एन2 च्या रूग्णांमध्ये वाढ 


कोरोनासोबतच राज्यात एच3एन2 च्या रूग्णांमध्ये देखील वाढ होत आहे. एच3एन2 च्या 119 रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये रुग्णालयात 73 जणांवर उपचार सुरु आहेत. एच3एन2 ची रुग्णसंख्या राज्यात 324 वर गेली आहे. राज्यात आतापर्यंत एच3एन2 मुळे तीन जणांचा मृत्यू झालाय. वाढत्या रूग्णसंख्येमुळे आरोग्य विभागाने खबरदारी घेतली असून रूग्णांवर वेळेत उपाचर करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत. 


"ऋतू बदलण्याच्या ट्रान्झिशन पिरिअडमध्ये अनेक आजार डोकं वर काढत असतात. अशात कोरोना आणि एच3एन2 सारख्या संसर्गजन्य आजारांनी डोकं वर काढल्यानं आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. इन्फ्ल्यूएन्झाच्या आजाराच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आढावा घेतलाय. वेळीच उपचार सुरु करण्याबरोबर जनजागृती देखील करावी अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत अशी माहिती मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे. 


वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकीकडे कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय तर दुसरीकडे इन्फ्ल्यूएन्झा आणि स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची देखील संख्या वाढत असल्यानं चिंतेचा विषय ठरत आहे.