नवी दिल्ली : दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव (Rajeev Satav) यांच्या पत्नी डॉक्टर प्रज्ञा सातव (Pradnya Rajeev Satav) यांना काँग्रेस विधानपरिषदेवर (Congress)  पाठवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.  लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार असल्याची देखील माहिती आहे.  जुलै 2024 पर्यंत या विधानपरिषदेची मुदत आहे. जर या जागेवर निवड झाली तर राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा त्यांच्या पत्नीकडे जाणार आहे. 


या रिक्त झालेल्या जागेसाठी चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, जितेंद्र देहाडे यांच्याही नावाची चर्चा सुरु होती.  एकाच जागेसाठी निवडणूक असल्याने महाविकासआघाडीसाठी ही निवडणूक फारशी अवघड नाही. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त जागेवर विधानपरिषदेसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी आहे. 29 नोव्हेंबरला विधानपरिषदेच्या या एका जागेसाठी निवडणूक अपेक्षित आहे. 16 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.


रणपिसेंच्या निधनानं रिक्त जागेवर काँग्रेस अनुसूचित समाजालाच प्राधान्य देणार?


शरद रणपिसे यांच्या रुपानं अनुसूचित जातीचं नेतृत्व काँग्रेसनं विधानपरिषदेत दिलं होतं. त्यामुळे ही जागा या समाजालाच मिळावी असा तर्क करत काँग्रेसमध्ये काही इच्छुक सरसावले आहेत. माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, रमेश बागवे यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसवर नुकतेच जनरल सेक्रेटरी म्हणून नियुक्त झालेले जितेंद्र देहाडे हे इच्छुकांच्या शर्यतीत होते. विधानपरिषदेत रणपिसे काँग्रेसचे गटनेते म्हणून काम पाहत होते. त्यांच्या निधनानंतर परिषदेत अनुसूचित जातींचा एकही आमदार नाही, त्यामुळे ही जागा एससी समाजालाच मिळावी असा आग्रह काहींनी दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींकडे केल्याचं कळलं होतं.. 
 
त्याशिवाय काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांच्या नावाचा विचार विधानपरिषदेसाठी होतो का याचीही उत्सुकता होती. राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठीही त्यांच्या नावाची चर्चा होती. पण राज्यसभा खासदारकी रजनीताई पाटील यांना देण्याचा निर्णय हायकमांडनं घेतला. त्यामुळे राज्यात विधानपरिषदेच्या माध्यमातून सातव कुटुंबाला भविष्यातल्या राजकारणासाठी ताकद दिली जाते का याचीही उत्सुकता होती. शेवटी प्रज्ञा सातव यांनाच संधी दिली जाणार असल्याची माहिती आहे.  या एका जागेची निवड आमदारांमधून होणार असल्यानं आणि महाविकास आघाडीकडे बहुमत असल्यानं काँग्रेसचा विजय निश्चित मानला जात आहे. शरद रणपिसे यांच्या निधनानंतरची उर्वरित चार वर्षांची टर्म म्हणजे  27 जुलै 2024 पर्यंतची टर्म नव्यानं निवडून आलेल्या आमदारास मिळणार आहे.