अहमदनगर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब विखे-पाटील यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. लोणीतील राहात्या घरी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. निधनसमयी त्यांचं वय 84 वर्ष होतं.


गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. महिन्याभरापूर्वीच त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचारही करण्यात आले होते. मात्र, आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.  शेतकऱ्यांचे नेते अशी त्यांची सुरुवातीपासूनच ओळख होती.

10 एप्रिल 1932 रोजी बाळसाहेब विखे-पाटलांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला होता. तब्बल आठ वेळा ते खासदार म्हणून निवडून आले होते. दरम्यान, मधल्या काळात काँग्रेस सोडून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना केंद्रीय अवजड उद्योग मंत्रीपद देण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर पुन्हा त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

बाळासाहेब विखे यांच्या राजकीय प्रवास तब्बल चार दशकांचा आहे. जिल्हा परिषद ते केंद्रात अर्थ राज्यमंत्री व उद्योग खात्याच्या कॅबिनेट मंत्रिपदापर्यंतचा हा प्रवास आहे. काही वर्षापूर्वीच त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. राज्यातील पहिले खासगी तंत्रनिकेतन १९८0 मध्ये प्रवरानगर येथे सुरु करुन त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाची चळवळ सुरु करण्याची मुहूर्तमेढ रोवली.