पिंपरी चिंचवड : मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसेल तर आमच्या कार्यकर्त्याला मंत्रिपद देऊन शपथविधी उरकून घ्या. सत्तेचा कार्यकाळ संपायला दहाच महिने उरलेत, अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी आपला संताप व्यक्त केला आहे. सत्तेचा कार्यकाळ संपायला केवळ दहाच महिने बाकी असून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे, असे ते म्हणाले.


तुमचा निर्णय होत नसेल तर आम्हाला एक मंत्रिपद देण्याचं आश्वासन आता पूर्ण करा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह केला असल्याचो आठवलेंनी आज सांगितलं. पिंपरी चिंचवडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत आठवले आज आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.

शिवसेना युतीत नसेल तर आरपीआयला चार जागा द्याव्यात
लोकसभा निवडणुकांसाठी महायुती झाल्यास आरपीआयला दोन आणि शिवसेना युतीत नसेल तर चार जागा द्याव्यात. तसेच लोकसंख्या वाढल्याने अडीच टक्के दलित समाजाचं तसेच ओबीसीचं दहा टक्के आरक्षण वाढवावं, अशा मागण्या करणार असल्याचं आठवले यावेळी म्हणाले.

सहगल यांचं निमंत्रण रद्द करणं अयोग्य
देशात लोकशाही असल्याने प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळं साहित्य संमेलनात सरकार विरोधात बोलू पाहणाऱ्या लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करणं हे अयोग्य असल्याचं ते म्हणाले. तसेच कोरेगाव भीमा येथे चंद्रशेखर आझाद यांना भाषण करू न देण्याचा निर्णयही चुकीचा असल्याचं म्हणत आठवलेंनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.