मुंबई: धर्मनिरपेक्ष भारत टिकून राहावा, भारतीय संविधान आणि त्यातील मूल्यांना धक्का लागू नये, असे ज्यांना ज्यांना वाटते, त्या सर्वांनी एकत्र येऊन, लोकशाहीविरोधातील मोदी सरकार घालवावं, असं थेट आवाहन राज्यातील साहित्यिक, विचारवंतांनी केलं आहे.


देशातल्या सध्य परिस्थितीवर साहित्यिक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली. तसंच एक पत्रक प्रसिद्ध करत लोकशाहीविरोधातील मोदी सरकार घालवण्याचं आवाहन जनतेला केलं.

प्रज्ञा दया पवार, तुषार गांधी, कुमार सप्तर्षी, लोकेश शेवडे, विजय दिवाण, यासारख्या साहित्यिक, विचारवंतांनी हे पत्रक प्रसिद्ध केलं आहे.

मोदी सरकार घालवण्याचं आवाहन

“संविधानावर विश्वास असणारा प्रत्येक भारतीय आज अस्वस्थ आहे. देशातील नागरिकांना व्यथित  करणाऱ्या घटनाच गेल्या चार वर्षात घडत आहेत. मग ती बीफच्या मुद्द्यावरुन अखलाकची हत्या असो, उत्तर प्रदेशातील उन्नावमधील बलात्कार किंवा जम्मूतील कठुआ गँगरेप असो, अशा उद्विग्न घटना घडत असताना, सरकार आरोपींना पाठिशी घालत असल्याचं दिसतं. तसंच हिंदुत्ववादी संघटनांमुळे हिंदू –मुस्लिम द्वेष पसरवला जात आहे.

मात्र ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी नागरिक म्हणून आपल्यावर येते. त्यामुळे भारतीय लोकशाही टिकून राहावी असं ज्यांना वाटतं, त्यांनी एकत्र येऊन, हे लोकशाही-विरोधी सरकार गेलेच पाहिजे, अशी ठोस भूमिका घ्यायला हवी”, असं या पत्रकात म्हटलं आहे.

साहित्यिक, विचारवंतांचं पत्रक

प्रज्ञा दया पवार, कुमार सप्तर्षी, राज कुलकर्णी, लोकेश शेवडे, तुषार गांधी, डॉ. राम पुनियानी, डॉ. विवेक कोरडे, सुनील वालावलकर, विजय दिवाण, राजन अन्वर, आशुतोष शिर्के,  डॉ. दिलीप खताळे,  किशोर बेडकीहाळ, सुरेश भुसारी, भारती शर्मा आणि डॉ. मंदार काळे या सर्वांनी मिळून हे पत्रक प्रसिद्ध केलं आहे.