मुंबई : पुढच्या 15 दिवसात देशात चित्र स्पष्ट होईल, कारण स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालं आहे. राज्यातील जनतेलाही आपल्या घरी जाता येणार, आम्हाला सर्व सुरळीत करायचं आहे, पण कोरोनाला टाळून करायचं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज फेसबुक लाईव्ह संवादात बोलत होते. ते म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊन आहे. 31 तारखेपर्यंत हा लॉकडाउन आहे. त्यानंतर काय? असा प्रश्न सगळ्यांपुढे असेलच. लॉकडाऊनचा प्रत्येकालाच कंटाळा आला आहे. ठाकरे म्हणाले की,  एकदम लॉकडाऊन करणं हे जसं चुकीचं आहे तसं तो एकदम उठवणंही चुकीचं आहे. हळूहळू सगळं सुरु करतो आहोत मात्र गर्दी झाली तर पुन्हा सगळं बंद करावं लागणार असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

ते म्हणाले की, दुकानं उद्योगधंदे, व्यवसाय सगळं सुरु होईल. मात्र शिस्त पाळली गेली नाही तर सगळं बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.  पुढच्या 15 दिवसात देशाचं चित्र स्पष्ट होईल, कारण स्थलांतर मोठ्या प्रमाणात झालं आहे असं मी सोनिया गांधी यांच्यासह झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगितलं. सध्या महाराष्ट्रात 50 हजार उद्योग सुरु झाले आहेत. सहा लाख कामगार हे कामावर रुजू झाले आहेत हळूहळू सगळ्या गोष्टी आपण सुरु करतो आहोत. मात्र हे सगळं करत असताना स्वयंशिस्त पाळली जाणं अत्यंत गरजेचं आहे. जर शिस्त दिसली नाही, गर्दी झाली तर मात्र सगळं काही पुन्हा बंद करावं लागेल, असं ठाकरे म्हणाले.


CM Uddhav Thackeray | कोरोनाचा गुणाकार जीवघेणा होणार, पण राज्य सरकार सज्ज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातलं अर्थचक्र कसं चालणार यावरही आम्ही लक्ष केंद्रीत केलं आहे. शेतकऱ्यांना बांधावरच बी-बियाणे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच 75 ते 80 टक्के कापूस खरेदीचाही विचार आहे असंही त्यांनी सांगितलं. सध्याचा काळ हा राजकारण करण्याचा काळ नाही. राज्यावरचं संकट टाळलं जाणं जास्त महत्त्वाचं आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

ते म्हणाले की, गेल्या काही दिवसात कोरोना रुग्ण वाढले, कोरोनासोबत जगायला शिका, हे मी सांगतो आहे, शिंकताना काळजी घ्या वगैरे उपाय करावे लागतील. सर्व सण समारंभ आपण घरीच साजरे केले, मुस्लीम बांधव सहकार्य करत आहेतच, ईदही कुठे गर्दी न करता, रस्त्यावर न येत घरी प्रार्थना करुन साजरी करा, असे आवाहन करतो, कोरोना संकट दूर होण्यासाठी दुआ करा, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मदत केल्याची जाहिरात करायची का? पॅकेजची मागणी करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्र्यांचा टोला

मार्च-एप्रिलपासून कोरोना संकट सुरु झालं. आता अचानक या रुग्णांची संख्या वाढली. मी आपल्याला याबाबत अगोदरच कल्पना दिलेली आहे. हा विषाणू गुणाकार करत जातो. या गुणाकाराला मर्यादा नाही, असं ते म्हणाले.

कोरोनाबाधित गर्भवतींची बालके कोरोनामुक्त हा निसर्गाचा चमत्कार आहे. मुंबईत नव्वदीच्या आजी कोरोनाला हरवून घरी गेल्या आहेत. कोरोना रुग्णांची आबाळ होत आहे, हे सत्य आहे. पण कोणाच्याही ध्यानीमनी नसताना हे संकट आलं आहे. सध्या सात हजार, तर मेअखेरपर्यंत 13 ते 14 हजार बेड्स उपलब्ध असतील, असंही ते म्हणाले.