नागपूर : ज्यांनी हल्लाबोल आंदोलन सुरु केलं आहे, त्यांचे डल्लामार पुरावे आपल्याकडे आहेत, असं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्यापासून सुरु होणारं हिवाळी अधिवेशन वादळी असेल याची झलक दिली आहे.


नागपुरात चहापानानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या सगळ्या आरोपांचा समाचार घेतला. इतकंच नाही, तर विरोधकांची गाडी ही अजूनही सैराटवरच अडकली असून, त्यातून बाहेर पडण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली.

दरम्यान, या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अनेक मुद्द्यांना हात घातला. सर्व पिकांमध्ये वाढ आहे, कापूस गेल्या वर्षी डिसेंबरपर्यंत 70.46 लाख होता, तो यावर्षी डिसेंबरच्या सुरुवातीलाच 51.90 लाख क्विंटल आला असल्याचं त्यांनी सांगितलं.

गोसीखुर्द प्रकल्पाबाबतची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यासाठी 18 हजार 500 कोटी रुपयांची मान्यता दिली आहे. पुढील 3 वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

''ज्यांना अर्ज करता आला नाही त्यांनाही कर्जमाफीचा लाभ''

दरम्यान कर्जमाफीला पात्र होते, मात्र त्यांना अर्ज करता आला नाही अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ देणार असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी या योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

कर्जमाफीसाठी एकूण 77 लाख खात्यांचे अर्ज आले. त्यापैकी 69 लाख खाती प्रोसेसिंगसाठी घेतले. त्यातून जवळपास 41 लाख खात्यांचे निर्णय झाले असून त्यांच्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

''नाना पटोलेंना त्यांच्या निर्णयाची लवकरच उपरती होईल''

भाजपचे खासदार नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा देत पक्षाचं सदस्यत्वही सोडलं आहे. मात्र त्यांचा हा निर्णय चुकीचा होता, याची उपरती त्यांना लवकरच होईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान भाजप आमदार आशिष देशमुख हे देखील नाना पटोले यांच्यानंतर बंड करण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. कारण त्यांनी विविध मुद्द्यांवर सात पानी पत्र मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. पण हे पत्र मला मिळण्याअगोदरच माध्यमांना मिळालं, असं म्हणत आशिष देशमुख यांच्यावरच पलटवार केला आहे.

संबंधित बातम्या :

स्वतंत्र विदर्भाची मागणी रास्त, आशिष देशमुख यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र


मुख्यमंत्र्यांनी माझ्या वाटेला जाऊ नये, एवढीच त्यांना सूचना : नाना पटोले