36 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
एबीपी माझा वेब टीम | 09 Jul 2017 05:19 PM (IST)
मुंबई : शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक कर्जमाफीनं 36 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शेतकऱ्यांसाठी 34 हजार कोटीच्या कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या 'मी मुख्यमंत्री बोलतोय' या कार्यक्रमात विविध प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिली. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफीबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे, कर्जमाफीचा गैरफायदा रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री म्हणाले की, ''राज्यातील 36 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असून, ही देशातली आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी आहे. तसेच दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचंही दीड लाखांपर्यंतच कर्ज माफ होणार आहे,'' असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. शिवाय या आधीच्या कोणत्याही सरकारनं शेतकऱ्यांसाठी एवढी मोठी कर्जमाफी दिली नसल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी आघाडी सरकारवर निशाणा साधला. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 25 हजारांची सवलत देणार असल्याचंही त्यांनी यावेळी पुन्हा स्पष्ट केलं. दरम्यान, कर्जमाफीच्या आकड्यावरुन सध्या एक मेसेज व्हायरल होतो आहे. त्या व्हायरल मेसेजच्या आकडेवारीवर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं.