रायगड: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लातूरमधील हेलिकॉप्टर अपघात ताजा असतानाच, पुन्हा एकदा ते हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत.


रायगड जिल्ह्यातील अलिबाग इथं मुख्यमंत्री आज एका कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी हेलिकॉप्टरचा पंखा त्यांच्या डोक्याला लागत होता. मात्र उपस्थित सुरक्षा रक्षक आणि अधिकाऱ्यांनी प्रसंगावाधन दाखवल्याने मोठा अनर्थ टळला.

अलिबाग इथं शेकाप आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळा होता. हा सोहळा संपल्यानंतर डोलवी-धरमतर येथील जेएसडब्ल्यू ईस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर दुपारी 1.55 वाजण्याच्या सुमारास, मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये चढण्यासाठी निघाले.

ते हेलिकॉप्टरमध्ये चढत असतानाच हेलिकॉप्टरने टेक ऑफ अर्थात उड्डाणास सुरुवात केली. त्यावेळी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरच्या वेगाने फिरणाऱ्या पंख्याखाली होते. हा पंखा मुख्यमंत्र्यांच्या डोक्याला लागण्याची शक्यता अधिक होती. मात्र तिथे उपस्थित वरिष्ठ सुरक्षा रक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना  बाजूला घेतल्याने ते थोडक्यात बचावले.

त्यानंतर हेलिकॉप्टर पुन्हा लॅन्ड करुन फॅनची रिटेस्ट घेऊन त्याच हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री फडणवीस मुंबईला रवाना झाले.