ठाणे : आनंद दिघे यांच्या पाठीशी उभं राहिलो, कारण ते नेते तसे होते. मात्र, आनंद दिघेंची शिवसेना आता स्वार्थी लोकांची झाली आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील पाचपाखाडीत बूथ कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला.


“ठाण्यात घरच्या नेत्यांकडे तिकीट वाटप करण्यात आले. शिवाय, उद्धवजींच्या सभा कोणत्या नातेवाईकांकडे होईल, यासाठीही भांडणं सुरु आहेत. एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांच्यासह अनेकांच्या घरात तिकिटं देण्यात आली.”, असा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

“महापालिका म्हणजे दुकान आहे, अशा मानसिकतेतून महापालिका चालली, तर महापालिका कधीच कुणालाच न्याय देऊ शकत नाही. त्यांच्यासाठी महापालिका सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे”, असा हल्लाबोलही मुख्यमंत्र्यंनी शिवसेनेवर केला. शिवाय, आमच्यासाठी सत्ता हे साधन आहे, साध्य नाही, असे सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

  • प्रत्येक घर पिंजून काढा, प्रत्येक घरात पोहचू, आपले किल्ले म्हणजे बूथ, बूथच्या सेनापतीने बूथ लढवायचा - मुख्यमंत्री

  • आता बोलायची वेळ नाही, छत्रपतींचं नाव घ्या आणि मैदानात जा, विजय तुमचा आहे, मुख्यमंत्र्यांचं कार्यकर्त्यांना आवाहन

  • लोकशाहीच्या मंदिराचं पावित्र्य खराब करू नका - मुख्यमंत्री

  • लोक भ्रष्टाचाराला वैतागले आहेत, आता परिवर्तन करुन दाखवा - मुख्यमंत्री

  • आम्हाला 'सामना'वर बंदी नको, त्यांनी केलेल्या चुकांबाबत जाब विचारला - मुख्यमंत्री

  • कल्याणकारी राज्य म्हणजे स्वतःचं कल्याण नाही, समाजाचं कल्याण करणारं राज्य - मुख्यमंत्री

  • आनंद दिघे यांची शिवसेना आता स्वार्थी लोकांची झाली आहे - मुख्यमंत्री

  • आमच्यासाठी सत्ता हे साधन आहे, साध्य नाही - मुख्यमंत्री

  • ठाणे जिल्हा हा भारतीय जनता पक्ष आणि जनसंघाचा होता - मुख्यमंत्री

  • युती तोडली पाहिजे, हे कार्यकर्त्यांपेक्षा ठाण्यातील लोकांनी मला मेसेज करून सांगितलं - मुख्यमंत्री