मुंबई : लहान मुलांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं व्यसन लागू नये, यासाठी राज्य सरकारने जालीम उपाय शोधला आहे. पानटपरी विक्रेत्यांना दुकानात यापुढे चॉकलेट, वेफर्स, बिस्किटं यासारखे खाद्यपदार्थ विकण्यास राज्यभरात बंदी असेल.


तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये चॉकलेट, बिस्किट, चिप्स यासारखे खाद्यपदार्थ आढळले, तर दुकानांवर कारवाई करण्यात येईल, असं अन्न आणि औषध प्रशासनाने स्पष्ट केलं.

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचा परवाना दिलेल्या दुकानांना खाद्यपदार्थाची विक्री करण्यास बंदी असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने गेल्या वर्षी जाहीर केलं होतं. मात्र हा निर्णय राज्य सरकारला बंधनकारक नसल्यामुळे याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार राज्य सरकारकडे सोपवले होते.

पानाच्या टपऱ्यांवर सर्रासपणे गोळ्या, चॉकलेट, बिस्किटं, शीतपेयं, चहा, कॉफी, वेफर्स, चिप्स यासारख्या खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. त्यामुळे हे पदार्थ घेण्यासाठी शालेय विद्यार्थी आणि तरुणवर्ग दुकानात येतो. त्याचवेळी तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थाकडे आकर्षित होण्याची शक्यता असते. विद्यार्थ्यांना तंबाखूचं व्यसन जडण्याची शक्यता वर्तवत सरकारने हा निर्णय घेतला आहे.

तंबाखूजन्य पदार्थांसोबत खाद्यपदार्थाची विक्री करण्यास बंदी करण्यात आल्यामुळे किराणा माल किंवा अन्य खाद्यपदार्थाच्या दुकानांमध्येही तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीला मनाई असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.