चिपळूण : गेल्या 24 तासांत अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड येथील परिस्थिती अतिबिकट बनली. चिपळूणला महापुराचा विळखा बसला असून संपूर्ण शहर चहुबाजूने पाण्यात आहे. हजारो लोक पुरात अडकले असून एनडीआरफच्या टीम बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत. चिपळूणच्या कळंबस्ते भागात एका घराच्या छतावर अडकलेल्या 15 जणांची गावकऱ्यांनीच धाडस करुन सुखरुप सुटका केली आहे. 


कळंबस्ते भागशाळेजवळ जिथे वाशिष्ठीचा प्रवाह भयंकर आहे तिथे रात्रीपासून 15 माणसे घराच्या छतावर अडकली होती. नदीचा प्रवाह जवळच असल्यानं नदी आणि घर एक आहे अशी स्थिती झाली होती. परिसरातील घरं पूर्ण पाण्यात होती. काल पहाटेपासून रात्री उशीरापर्यंत लोकं अडकली होती. यात वृद्धांसह लहान मुलं देखील होती. 


Chiplun Flood : चिपळुणला पुराचा वेढा! NDRF च्या दोन टीम दाखल, बचावकार्य सुरु असल्याची NDRF प्रमुखांची माहिती


इथं अडकलेल्या लोकांशी कुणाचाही संपर्क होत नव्हता. लोकल टीम तिकडं जाण्याचा प्रयत्न करत होती मात्र प्रवाह जास्त असल्याने जाऊ शकली नाही अशी माहिती संबंधितांच्या नातेवाईकांकडून मिळाली होती.  चिपळूणमध्ये एमर्जन्सीसाठी दिलेल्या काही फोन नंबरवर फोन केले असता ते देखील नेटवर्क नसल्याने लागत नव्हते. अशात छतावर अडकलेल्या 15 जणांची रात्रीच्या सुमारास गावकऱ्यांनीच धाडस करुन सुखरुप सुटका केली आहे. गावकऱ्यांनी रस्सीच्या मदतीने इथल्या लोकांना बाहेर काढल्याचं निकेत सुर्वे यांनी एबीपी माझा डिजिटलला सांगितलं. 


Maharashtra Rain Updates : राज्यात पावसाचं रौद्ररुप! कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी, पुढील 3 तास महत्वाचे


एबीपी माझाला अनेक प्रेक्षकांचे मदतीसाठी फोन
एबीपी माझाला चिपळूण, खेडमधून अनेक प्रेक्षकांचे मदतीसाठी फोन येत आहेत. या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने एनडीआरएफ कमांडंट अनुपम श्रीवास्तव यांच्याची संपर्क साधला. अनुपम श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार चिपळूणमधील पूरपरिस्थिती लक्षात घेत एनडीआरएफच्या दोन टीम आधीच त्याठिकाणी पाठवल्या आहेत. या दोन्ही टीम चिपळूणमध्ये पोहोचल्या असून त्यांनी पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचं काम सुरु केलं आहे. चिपळूणमधील पुराची स्थिती लक्षात घेता आणखी दोन टीम तेथे पाठवण्यात येणार आहेत. मध्यरात्रीपर्यंत एक एक टीम चिपळूण आणि खेडमध्ये दाखलं होतील. आणखी मदतीची गरज भासल्यास राज्य सरकारची बातचित करुन आणखी टीम आवश्यकतेनुसार पाठवल्या जातील. एका टीममध्ये 45 जवान असतात. टीमसोबत पाच बोट, लाईफ जॅकेट, खाण्यापिण्याचं सामान देखील असतं. पुराच्या पाण्यातून लोकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवलं जाईल, असं अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितलं. 


मदतीसाठी नागरिकांना जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा


हजारो लोक पाण्यात अडकले आहेत. पाण्यात अडकलेल्या नागरिकांनी जिल्हा प्रशासनाशी किंवा जिल्हा कंट्रोल रुमशी तात्काळ संपर्क साधावा. एनडीआरएफ देखील जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेत आहे. जिल्हा प्रशासनाला किंवा कन्ट्रोल रुमला फोन केला तर ती माहिती आम्हाला मिळेल आणि जेणेकरुन आम्ही लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचू, असं आवाहन अनुपम श्रीवास्तव यांनी केलं.