नागपूर : लवकरच राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचं वय 65 वरुन 60 होणार आहे. महिन्याभरात नवीन निर्णय लागू करण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेंनी केली आहे.


यामुळे लाभार्थ्यांची संख्या वाढणार असून अनेकांना सवलतीच्या दरात एसटी पास आणि वृद्धापकाळातील निवृत्ती योजनांचा आर्थिक लाभ मिळण्यास मदत होणार आहे. मात्र, यामुळे राज्याच्या तिजोरीवर तब्बल 200 कोटींचा बोजा पडणार आहे.

सध्या केंद्र सरकारच्या नियमानुसार ज्येष्ठ नागरिकत्वाचं वय 60 वर्ष आहे. तर राज्य सरकारच्या नियमानुसार ते 65 आहे. त्यामुळे केंद्राच्या नियमानुसार राज्यातही ज्येष्ठ नागरिकांचं वय 60 वर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांचं वय 65 वरुन 60 वर्ष करावं अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून जोर धरत होती. अखेर राज्य शासनानं ही मागणी मान्य केली आहे.