मुंबई : भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांची मुंबईत सभा रद्द झाली आहे. सोबतच पोलीस त्यांनी पुण्यालाही जाऊ देणार नाहीत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे चंद्रशेखर आझाद यांची आज 29 डिसेंबर रोजी वरळीच्या जांबोरी मैदानात संध्याकाळी 4 वाजता सभा होणार होती.


वरळी पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली होती. मात्र तरीही सभा होणारच असा निर्धार भीम आर्मीने केला होता. चंद्रशेखर आझाद मालाडच्या हॉटेल मनालीमध्ये थांबले होते. नंतर पोलिसांनी त्यांना अज्ञातस्थळी नेलं होतं.

पोलिसांनी आपल्याला रूममध्ये बंद करून ठेवले आहे, अशा आशयाचा चंद्रशेखर आझाद यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. येणाऱ्या निवडणुकीत मोदी सरकारला हे महागात पडेल. . मोदी सरकारने हे युद्ध सुरु केले असून याचा अंत भीम आर्मी करणार, असा इशाराही आझाद यांनी या व्हिडीओत  दिला आहे. दरम्यान मुंबई पोलीस आझाद यांना विमानात बसवून देणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आझाद थांबलेल्या हॉटेल मनालीच्या 500 मिटरच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील सर्व पोलीस स्टेशन हायअलर्ट देण्यात आला आहे. चंद्रशेखर आझाद मालाडच्या हॉटेल मनालीमध्ये थांबले होते. शुक्रवारी त्यांनी आपल्याला मुंबई पोलिसांनी नजरकैदेत ठेवल्याचा गंभीर आरोप केला होता.

आझाद पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यानिमित्त त्यांच्या राज्यात विविध ठिकाणी पाच सभा नियोजित आहेत. त्यातील पहिली सभा 29 डिसेंबर रोजी वरळीच्या जांबोरी मैदानात संध्याकाळी 4 वाजता होणार होती. त्यानंतर 30 डिसेंबरला पुण्यात सभा, 31 डिसेंबरला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्याख्यान, 1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, 2 जानेवारीला लातूर येथे सभा त्यानंतर 4 जानेवारीला अमरावती येथे जाहीर सभा असा नियोजित कार्यक्रम होता.