Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. वर्धा नदीत पोहताना दोन मुलं बुडाल्याची घटना घडली आहे, तर दोन मुलांना वाचवण्यात यश आलं आहे. वरोरा शहराजवळ असलेल्या वर्धा नदीच्या तुराणा घाटावर ही दुःखद घटना घडली आहे. बुडलेल्या मुलांचा शोध सुरु आहे, मात्र संध्याकाळ झाल्याने शोध कार्य थांबवण्यात आले असून उद्या सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू होणार आहे.
नेमकी कशी घडली घटना?
वरोरा शहरातील कर्मवीर वार्डमधील रुपेश विजेंद्र खूळसंगे (वय 13 वर्ष) आणि प्रणय विनोद भोयर (वय 15 वर्ष) ही दोन मुले त्यांच्या दोन मित्रांसोबत पोहण्यासाठी सायकलने वर्धा नदीच्या तुराणा घाटावर गेली होती. नदीपात्रात खोल पाणी असल्याने तिथे पोहत असताना चारही मित्र बुडू लागले. मुलांचा आवाज ऐकल्यावर जवळच असलेल्या एका गुराख्याने त्वरित त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले, गुराख्याने उमंग धर्मेंद्र आत्राम आणि कृष्णा चंद्रकांत कुईजडे या दोन मुलांना यशस्वीरित्या किनाऱ्यावर काढले. मात्र दुर्दैवाने रुपेश आणि प्रणय ही दोन मुले खोल पाण्यात वाहून गेली. घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर येथील रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Ratnagiri News : दहा जणांचा ग्रुप फिरायला आला, समुद्रात पोहायला उतरले, एक लाट आली अन् होत्याचं नव्हतं झालं, चार जणांचा मृत्यू