मुंबई : भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड झाली आहे. खरंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपसाठी विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांच्या नावांचीही भाजपच्या गोटात चर्चा होती. मात्र पक्ष नेतृत्त्वाने चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. शिवाय माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चंद्रकांत पाटील यांच्या नावाला पसंती आहे. दरम्यान मुंबई प्रदेशाध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांची निवड करण्यात आली आहे.


या दोन्ही निवडीसंदर्भात भाजपने पत्रक जारी केलं आहे. त्यात लिहिलं आहे की, "भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी चंद्रकांत पाटील यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. अध्यक्षांनी मंगलप्रभात लोढा यांची मुंबईच्या अध्यक्षपदी नेमणूक केली आहे. ही नियुक्ती तात्काळ लागू असेल."



चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड होण्याची कारणं?
मागच्या निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात सातारा लोकसभा आणि विधानसभेत पश्चिम महाराष्ट्रात म्हणावं तसं यश भाजपला संपादन करता आलं नाही. पण तरीही चंद्रकांत पाटील हे अमित शाह यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात. तसंच चंद्रकांत दादा उपद्रवी नसल्याने देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील यांची फेरनिवडसाठी आग्रही होते, असं बोललं जातं.

मंगल प्रभात लोढा पुन्हा मुंबई अध्यक्ष!
दुसरीकडे मुंबई अध्यक्षपदी आमदार मंगल प्रभात लोढा यांचीही फेरनिवड झाली आहे. आशिष शेलार यांची तत्कालीन फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदी नियुक्ती झाल्यावर, मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी मंगल प्रभात लोढा यांच्याकडे सोपवण्यात आली होती. आता त्यांच्याकडेच मुंबई अध्यक्षपद कायम ठेवण्यात आलं आहे.

दरम्यान मुंबई अध्यक्षपदासाठी मंगल प्रभात लोढा यांच्या नावाला विरोध होता. त्यांच्याऐवजी खासदार मनोज कोटक, आमदार पराग अळवणी, योगेश सागर, सुनील राणे यांची नावं चर्चेत होती. परंतु भाजप अध्यक्षांनी मंगल प्रभात लोढा यांच्यावरच पुन्हा एकदा विश्वास दाखवला.