नागपूर : कल्याण शहरात खड्ड्यांमुळे पाच जणांचा बळी गेला. यावर प्रतिक्रिया देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी आता दिलगिरी व्यक्त करत आपण कुणाच्याही भावना दुखावण्यासाठी ते वक्तव्य केलं नसल्याचं म्हटलं आहे.


ज्या रस्त्यावर पाच लोकांचा बळी गेला त्याच रस्त्यावरून पाच लाख लोकांनी त्या दिवशी प्रवास केला. मग सगळाच दोष सरकारला कसा देता येईल? असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी खड्ड्यांची जबाबदारी महापालिकेवर ढकलण्याचा प्रयत्न केला होता. सांगलीत केलेल्या या वक्तव्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी आज हे वक्तव्य कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी केलं नव्हतं, असं म्हणत दिलगिरी व्यक्त केली.

रस्ता खराब आहे असं आपण म्हणतो तेव्हा चालकांच्याही काही चुका असतात असं मला म्हणायचं होतं. मृतांच्या कुटुंबीयांचा अनादर करण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

कल्याणमध्ये खड्ड्यांमुळे पाच जणांचा जीव गेला आहे, तर सायन-पनवेल हायवेवर दोन दुचाकीस्वारांनी आपला जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत मंत्र्यांनी जबाबदारी ढकलल्यामुळे संताप व्यक्त केला जात होता. चंद्रकांत पाटील यांनी अखेर यावर दिलगिरी व्यक्त केली.