Chandrakant patil :  पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या नियोजित कार्यक्रमानंतर लंच पे चर्चा'च्या माध्यमातून सरपंचांशी संवाद साधला. गावच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची सूचना यावेळी त्यांनी सर्वांना केली. पुणे जिल्हा परिषेदेने आयोजित केलेल्या जलजीवन मिशन कार्यशाळेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. जलजीवन मिशनमुळे ग्रामीण भागाचे चित्र पालटणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी मार्गदर्शन करताना दिला.


या कार्यक्रमानंतर पालकमंत्री पुढील कार्यक्रमास निघणार होते. जेवणाचीही वेळ झाली असल्याने तसेच सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसोबत थेट संवाद साधण्याची संधी असल्याने त्यांच्यासोबतच भोजन करण्याचा निर्णय पाटील यांनी घेतला. त्यांनी काही महिला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.


जलजीवन मिशन ग्रामीण भागासाठी अतिशय महत्त्वाचा असल्याची भावना यावेळी महिला सरपंचांनी व्यक्त केली. ग्रामीण भागाचा विकास ही आपली प्राथमिकता आहे. गावच्या विकासासाठी मी नेहमीच कटीबद्ध आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सर्वांना समान निधी उपलब्ध करून दिला आहे. आपणही सर्वांना सोबत घेऊन काम करावा, अशी अपेक्षा यावेळी पालकमंत्री पाटील यांनी व्यक्त केली.


सरपंच खूश

पालकमंत्री यांच्यासोबत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करता आली आणि त्यासोबतच त्यांच्याबरोबर भोजनाचा आस्वाद घेता आला. त्यामुळे सरपंच आनंदी झाले होते. गावासंदर्भात विविध योजना आणि त्यांची अंमलबजावणी कशी करता येईल यावर चंद्रकांत पाटील आणि सरपंच्यांमध्ये चर्चा झाली. वेगवेगळ्या कल्पनाही सरपंचांनी सांगितल्या. त्यांच्यासमोर मनमोकळे पणाने विचार मांडता आल्याने सरपंचदेखील खूश दिसले.


महिला सरपंचाचा सहभाग

या जलजीवन मिशन कार्यशाळेत पुरुष सरपंच्यांसोबत महिला संरपंचदेखील सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक चर्चेत महिलांनी आपले प्रश्न मांडले. गावाच्या विकासासाठी त्यांचाही मोठा सहभाग असल्याचं महिलांनी सांगितलं. अनेक तरुण महिला सरपंचांचाही यात मोठा सहभाग होता. या महिला सरपंच आपल्या लहान बाळांनासोबत घेऊन या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे या महिलांचं सगळ्यांनी कौतुकही केलं. महिलांना गावाकरीता काय करणं अपेक्षित आहे आणि त्या काय काय करु शकतात, अशा सगळ्या प्रश्नांवर चंद्रकांत पाटील यांच्याशी महिलांनी संवाद साधला.