मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी शिव्या शाप देण्यासाठी हा मेळावा घेतला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rrane) यांनी शिवसेनेच्या (Shiv Sena) दसरा मेळाव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलीय. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केलीय. उद्धव ठाकरे यांनी शिव्या शाप देण्यासाठीच सभा घेतली होती.  कारण त्यांच्या भाषणातून वैचारिक आणि बौद्धिक काहीच नव्हते परंतु, फक्त शिव्याच होत्या, अशी टीका नारायण राणे यांनी केलीय. 


"बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातून आम्हाला विचारांची मेजवानी मिळत असे. त्यातूनच आमची जणघडण झाली.  मोठ-मोठ्या लोकांची नावं घेऊन टीका केल्यानंतर त्यांना आपल्याला मोठं म्हणतील असे वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची नावे घेऊन टीका केली. अडीच वर्षात फक्त अडीच तासच मंत्रालयात येणारे मुख्यमंत्री आहेत. मराठी माणसांसाठी यांनी काय केलं. केलं असतं तर मेळाव्यातून शिव्या देण्यापेक्षा अडीच वर्षात केलेली कामे सांगितली असती. आपण कोण आहोत याची ठाकरेंना जाणीव करून दिली पाहिजे, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.  


 "यावेळचा शिवाजी पार्कचा दसरा मेळावा म्हणजे तमाशा पद्धतीचा मेळावा होता. उद्धव ठाकरे बोलायला लागल्यानंतर लोक उठून गेले. शिवसेनेचा मेळावा शिमग्यासारखा झाला.  कारण शिमग्याला शिव्या द्यायचं काम होतं तसचं चित्र पवित्र शिवतीर्थावर पाहिला मिळालं. त्यांनी शिव्या शाप देण्यासाठी मेळावा घेतला होता काय, असं चित्र होतं.  केवळ शिव्या देण्याचं काम त्यानी केलं.  बाळासाहेबांच्या विचारांतून प्रेरणा मिळत होती. त्यातून आमची जडणघडण झाली. त्यामुळेच इथपर्यंत पोहचलो. आताचे विचार पाहिलं तर त्यांना दुसरं काही येतं की नाही माहिती नाही. उद्या कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्याला जबाबदार उद्धव ठाकरे असतील. आमच्या नेत्यांवर टीका केली तर खपवून घेणार नाही, असा इशाराच नारायण राणे यांनी दिलाय. 


"यांना वाकायला देखील डॉक्टर लागतो तर मग काय विधायक कामे हे करणार. मोदी यांचं नाव आणि फोटो लावून निवडणूक लढली आणि त्यांचे लोकं निवडून आले.  परंतु, उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी लबाडी केली. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाबाबत बोलूच नये.  उद्धव ठाकरे यांनीच सदा सरवणकर यांना मनोहर जोशी यांच्या घरावर हल्ला करायला सांगितलं होतं, असा आरोप नारायण राणे यांनी केलाय. शिवाय यांनी छोटा राजन आणि छोटा शकील यांना मला मारण्याची सुपारी दिली. परंतु, मी अजूनही जिवंत आहे, असा आरोप राणे यांनी केलाय.


उद्धव ठाकरे यांनी राज्यासाठी काय केलं? एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होण्याचा अधीकार आहे.  एकनाथ शिंदे यांच्यामुळे  शिवसेना कानाकोपऱ्यात पोहचली, असे नारायण राणे यावेळी म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या


उद्धव ठाकरे यांनी मला मारण्यासाठी छोटा राजन आणि छोटा शकील यांना सुपारी दिली होती; नारायण राणेंचा गंभीर आरोप