मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परदेश दौऱ्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. 4 जुलैला नागपुरात सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी आणि शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर विस्ताराचा मुहूर्त ठरणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.


पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कृषी व फलोत्पादन खात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी परदेशी जाण्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांना सोपवली असून, लवकरच अधिसूचना काढून अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळ नियुक्त्यांवर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. अमित शाहांनी या विस्ताराला हिरवा कंदील दिला, त्यानंतर हालचालींना वेग आला.

दरम्यान, रखडलेल्या महामंडळ नियुक्त्या आणि वरिष्ठ आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा मार्गही मोकळा झाला आहे.