मुंबई : महाराष्ट्रात सर्वदूर मान्सून दाखल झाला आहे. मुंबईत सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी सतर्कतेचा इशारा मात्र कायम आहे.


मुंबईत जोरदार पावसाची शक्यता

काल पावसानं मुंबईला धुवून काढल्यानंतर आजही मुंबईत जोरदार पावसाची शक्यता आहे. सध्या तरी मुंबईत पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र मुंबईवर सध्या ढगांची दाटी झाली आहे. आणि पावसाळी वातावरण तयार झालं आहे. काल मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. मुंबईत 12 जूनपर्यंत मुंबईत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.

कोकणात पावसाची हजेरी

कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यात अखेर पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. काल सकाळपासून सिंधुदुर्ग, रत्नागिरीत जोरदार पाऊस बरसतो आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर, रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याचं समजतं आहे.

मराठवाडा, विदर्भातही पावसाची दमदार हजेरी

मराठवाडा, विदर्भातही पावसाने दमदार हजेरी लावली. विदर्भातील अमरावती शहरात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अमरावतीकरांना थंडाव्याची अनुभूती घेतली. जवळपास अमरावती जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावली. तर मराठवाड्यातल्या उस्मानाबाद, नांदेड, लातूर आणि बीडमध्ये पावसानं काल बॅटिंग सुरुच ठेवली. त्यामुळे कोरडेठाक पडलेल्या धबधब्यांना पाझर फुटलं आहे.