पणजी (गोवा) : संरक्षण मंत्री पदाचा राजीनामा देऊन गोव्याच्या राजकरणात परतलेल्या मनोहर पर्रिकर यांना पोटनिवडणूक लढवून विधानसभेचे सदस्य बनावे लागणार आहे. पर्रिकर सध्या उत्तर प्रदेशमधून राज्यसभा सदस्य आहेत. गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देखील राज्यसभा सदस्यत्व सोडलेले नाही. पर्रिकर यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला होता. आता 23 ऑगस्ट रोजी होणाऱ्या निवडणुकीत निवडून येऊन पर्रिकर यांना विधानसभेचा सदस्य बनावा लागणार आहे.


पर्रिकरांसाठी कुंकळ्येकर यांचा राजीनामा

मनोहर पर्रिकर यांच्यासाठी पणजीतून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन पणजीची जागा पर्रिकर यांच्यासाठी खाली केली होती. पर्रिकर संरक्षण मंत्री बनल्यानंतर कुंकळ्येकर पणजी मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवून निवडून आले होते. 2017 च्या निवडणूकित सुद्धा कुंकळ्येकर यांनी बाबुश मोन्सेरात यांचा पराभव करून पणजीचा बालेकिल्ला कायम राखला होता.

पर्रिकर यांच्या विरोधात कोण?

पर्रिकर यांच्या विरोधात काँग्रेस ज्या माजी मंत्री बाबुश मोन्सेरात यांना निवडणूक रिंगणात उतरवून पर्रिकर यांच्या समोर तगडे आव्हान निर्माण करण्याचे मनसुबे बाळगुन होता, त्या मोन्सेरात यांनी काँग्रेसचा हात झिडकारुन भाजप आघडी सरकारचा महत्वाचा घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड मध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेस आता पर्रिकर यांच्या विरोधात कोणाला निवडणूक रिंगणात उतरवणार याकडे सगळ्याचे लक्ष लागून राहिले आहे.

आप’कडून पोटनिवडणुकीसाठी चाचपणी

2017 च्या निवडणुकीत आम आदमी पक्षा तर्फे वाल्मीकि नाईक यांनी भाजपच्या सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र पर्रिकर यांचे वर्चस्व असल्याने ‘आप’ची डाळ अजिबात शिजू शकली नव्हती. आता पुन्हा एकदा पणजी मतदार संघातून निवडणूक लढवण्याची चाचपणी ‘आप’ने सुरु केली आहे. पोटनिवडणूक जाहीर झाली की याबाबत घोषणा केली जाईल असे कालच आप नेते एल्विस गोम्स यांनी सांगितले होते. त्यामुळे ‘आप’ची भूमिका काय ठरते हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

गोसुमं आणि शिवसेना लढणार?

भाषा माध्यमाच्या प्रश्नावर भाजप विरोधात राजकीय भूमिका घेऊन आरएसएसचे नेते सुभाष वेलिंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली 2017 च्या निवडणुका लढवलेल्या गोवा सुरक्षा मंचने पणजीची पोटनिवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले आहेत. 2017 च्या निवडणुकीत गोवा सुरक्षा मंचतर्फे पणजीमधून निवडणूक रिंगणात उतरलेल्या डॉ. केतन भाटीकर यांनी गोवा सुरक्षा मंचची साथ सोडून पर्रिकर यांच्याशी हातमिळवणी केल्यामुळे गोवा सुरक्षा मंचला पर्रिकर यांना टक्कर देईल अशी क्षमता असलेला उमेदवार शोधावा लागणार आहे. भाषा माध्यमावरुन पर्रिकर यांच्याशी राजकीय वैर पत्करलेल्या सुभाष वेलिंगकर यांची भूमिका काय असणार हे देखील महत्वाचे ठरणार आहेत.

वेलिंगकर यांनी 2017 च्या निवडणूक प्रचारात पर्रिकर यांच्यावर कडवट शब्दात टीका केली होती. वेलिंगकर हे पणजीचे मतदार असल्याने ते पुन्हा एकदा पर्रिकर यांच्या विरोधात भूमिका घेतात की आरएसएस मध्ये राहून तटस्थ राहतात याकडे सगळ्याचे लक्ष असणार आहे.

शिवसेनेचे गोवा प्रभारी संजय राऊत यांनी पणजी आणि वाळपईच्या पोटनिवडणुका लढवणार असल्याचे स्पष्ट केले होते. पोटनिवडणुका जाहीर झाल्यानंतर शिवसेना स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार की गोवा सुरक्षा मंचला पाठिंबा देणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वाळपईत राणे विरोधात रॉय नाईक

17 आमदार निवडून येऊन देखील काँग्रेसला सरकार स्थापन करण्यात आलेल्या अपयशामुळे नाराज होऊन विश्वजीत राणे यांनी आमदारकीची शपथ घेऊन अवघ्या काही तासांच्या आत आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे वाळपई मतदार संघाची पोटनिवडणूक पणजी सोबत होणार आहे. राणे हे भाजपमध्ये प्रवेश करून आरोग्य मंत्री बनले आहेत. त्यांच्या सोबत वाळपई मतदारसंघातील पंच सदस्य, नगरसेवक, जिल्हा पंचायत सदस्य आणि काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपवासी झाले आहेत. अशा परिस्थित राणे यांचे पारडे जड मानले जात आहे.

काँग्रेसने फोंड्याचे आमदार रवी नाईक यांचे चिरंजीव रॉय नाईक यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचे निश्चित केले आहे. वाळपई मतदारसंघाच्या काही भागात रॉय यांचे वर्चस्व असल्याने काँग्रेस रॉयच्या माध्यमातून राणे यांना टक्कर देणार की राणे वाळपई काँग्रेसमुक्त करण्यात यशस्वी होतात याचे उत्तर 28 ऑगस्टला मिळणार आहे.

अशी होणार पोटनिवडणूक

पणजी आणि वाळपई मतदारसंघाच्या पोटनिवडणूका निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. 23 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून 28 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.

29 जुलै रोजी याची अधिसूचना जाहिर केली जाणार आहे. 5 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येणार असून 7 ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. 9 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी मतदान आणि 28 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.