विरार : विरारमध्ये तांदूळ व्यापाऱ्यावर गोळीबार करुन अंदाजे 30 लाखांची रक्कम लुटून चोरटे पसार झाले आहेत. व्यापारी अशोक रमणलाल शहा यांच्यावर विरारच्या संजीवनी रुग्णालयात उपचारादरम्यान आज मृत्यू झाला.


 

विरारच्या चंदनसार रोडवर रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास व्यापाऱ्याच्या दुकानासमोरच ही घटना घडली. रमणलाल घरी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला आणि रमणलाल यांच्याकडील 30 लाख रुपयांची पिशवी लंपास केली. हल्ला केल्यानंतर रोकड घेऊन चोरट्यांनी विरार हायवेच्या दिशेने पळ काढल्याचा संशय पोलिसांना आहे.

 

विरार पूर्व चंदनसार रोडवर होलसेल तांदूळचं मोठं दुकान आहे. या दुकानात रविवार, सुट्टीच्या दिवशी तांदळाची मोठ्या प्रमाणात विक्री होते. दिवसभराचा गल्ला तांदळाच्या थैलीत घेऊन अशोक शाह रात्री साडे नऊ ते दहाच्या सुमारास घरी जात होते. त्याचवेळी गोळीबाराची घटना घडली.