लातूर :लातूरहूनवरुन 49 प्रवासी आणि 6 यात्रा व्यवस्थापक यांच्यासह  55 जणांना घेऊन केदारनाथ, बद्रिनाथ यात्रेला निघालेली एक खासगी बस नेपाळ हद्दीत शुक्रवारी पहाटे जळून खाक झाली. सुदैवाने या बस मधील सर्व भाविक सुखरुप आहेत. मात्र बसमधील सर्व साहित्य आणि पाच लाख रुपये रोख जळून खाक झाले आहेत. अशी माहिती यात्रा व्यवस्थापक सिद्धेश्वर मोहिते यांनी दिली आहे.


या घटनेची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना मिळताच त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला. त्यानंतर घटनास्थळी वेगाने प्रशासकीय मदत पोहचवण्यात आली.

लातूर येथून खासगी बस 30 एप्रिल रोजी प्रवासाला निघाली होती. केदारनाथ-बद्रिनाथ यात्रा करुन ही बस नेपाळ दर्शनासाठी 9 मे रोजी पुढे निघाली. मात्र, भरत घाटामध्ये बसमध्ये बिघाड झाला. भाविकांची जवळच्या निवास स्थानी व्यवस्था करण्यात आली. तर यात्रा व्यवस्थापकाचे साडेतीन लाख रुपये तसे इतर भाविकांची रक्कम, सोबत आणलेल्या साहित्याच्या पिशव्या, महिनाभराचे किराणा साहित्य बसमध्येच होते. त्यामुळे बसमध्ये चालकासह चार जण झोपले होते.

अचानक शुक्रवारी पहाटेच्या एक  वाजेच्या सुमारस बसच्या डाव्या बाजूकडील चाक पेटल्याचे रामदास अंगद इरले यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा केल्याने बसची राखण करण्यासाठी बसमध्येच झोपलेले सर्वजण बाहेर पडले.

सोबत असलेल्या पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना अपयश आले. शेवटी, बसमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. त्यानंतर यात्रा व्यवस्थापकाने सर्व भाविकांना भरत घाट येथून भारताच्या हद्दितील महाराजगंज जिल्ह्यातील नौतनवा या तालुक्याच्या ठिकाणी आणले.

सध्या हे सर्व भाविक नौतनवा येथील धर्मशाळेत आश्रयाला असून, कोणालाही इजा झालेली नाही. अशी माहिती  यात्रा व्यवस्थापक सिद्धेश्वर  मोहिते यांनी दिली आहे.

परंतु, सर्व साहित्य जळाल्याने अंगावरील कपड्यावरच हे भाविक धर्मशाळेत आश्रयाला आहेत. यात्रा व्यवस्थापक दुसऱ्या बसची व्यवस्था करुन सर्वांना लातूरला परत आणणार आहेत. हे सर्व भाविक लातूर तालुक्यातील आहे.