औरंगाबाद : औरंगाबादेत एका बंटी आणि बबलीने मेणबत्ती तयार करण्याच्या गृहउद्योगाच्या नावाखाली अनेकांना गंडा घातल्याचं उघड झालं आहे. गृहउद्योगाच्या नावाने या बंटी बंबलीने 400 महिलांची फसवणूक केली आहे. सगळे पैसै घेऊन आता हे पसारही झाले आहेत.


'बंटी बबली' या सिनेमाप्रमाणेच औरंगाबादमध्ये एका दाम्पत्याने जवळपास 400 महिला पुरुषांना गंडा घालत पोबारा केला आहे. मूळचे नागपूरचे असणारे प्रशिक बनसोड आणि नेहा बनसोड या दाम्पत्याने औरंगाबादेत ग्लोबल गृहउद्योगाच्या नावाखाली कंपनी सुरु केली. त्याची जाहिरात अल्प भांडवलात मेणबत्ती तयार करण्याचा गृहउद्योग सुरु करा, मेणबत्ती तयार करण्यासाठीचा कच्चा माल कंपनी पुरवणार आणि मेणबत्तीही विकत घेणार, प्रतिमेणबत्ती 5 रुपये देणार असे लोकांना सांगण्यात आले. फक्त कच्च्या मालासाठी डिपॉझिट करायचे आणि कमाई सुरु, असे आमिष दाखवल्यानं अनेकांनी कच्च्या मालाचे पैसै या दाम्पत्याला दिले आणि मेणबत्ती बनवणे सुरुही झाले.

जवळपास 400 महिला या उद्योगात या बंटी-बबलीनं जोडल्या सुरुवातीला पैसै दिले. मात्र, 10 दिवसांपूर्वी अचानक हे दाम्पत्य गायब झाले आणि पैसै गुंतवणूकदार घाबरले, कुठलाही ठावठिकाणा न लागल्याने अखेर पीडितांनी पोलिसांकडे धाव घेतली.

हे प्रकरण प्रथमदर्शनी मोठ्या फसवणुकीचं असल्याने औरंगाबाद पोलिसांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण सोपवलं आहे. आतापर्यंतच्या तपासात 1 कोटींची फसवणूक समोर आली आहे. पोलिसांनी या कंपनीचे भाड्याचे असलेले कार्यालय सील केले आहे, तर कार्यालयातील सर्व सामान जप्त करण्यात आले आहे.

याआधी बनसोड दाम्पत्याने नागपूरमध्ये सुद्धा लोकांची अशाच पद्धतीनं फसवणूक केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी तातडीनं बनसोड दाम्पत्याची बँक खातीही सिल केली आहेत. त्यातही 10 लाख रुपये असल्याची माहिती मिळते आहे.

आता हे प्रकरण समोर आल्यानं पोलिस ठाण्यात तक्रारी देण्यासाठी ओघ वाढत चालला आहे. त्यामुळे या बंटी बबलीनं हजारावर लोकांना फसवलं असू शकतं असा अंदाज पोलिस व्यक्त करत आहेत.