मुंबई : राज्यात उद्या (22 एप्रिल) संध्याकाळी आठपासून ब्रेक द चेन अंतर्गत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे कडक निर्बंध असणार आहेत. राज्यात सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून आणखी नियम कठोर करण्यात आले आहेत.


काय सुरू असेल?



  • उद्या रात्री 8 वाजल्यापासून 1 मे च्या सकाळी 7 पर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन

  • मुंबई लोकलचा प्रवास केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच करता येणार

  • खासगी व सार्वजनिक वाहतूकही केवळ अत्यावश्यक लोकांसाठीच

  • एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात नागरिकांना प्रवेश बंदी. मात्र सबळ कारण असेल तर प्रवेश दिला जाणार. अत्यावश्यक सेवेतील लोकांना मात्र मुभा.

  • सर्व सरकारी कार्यलयात केवळ 15 टक्के उपस्थिती राहणार. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार आहेत.

  • लग्नकार्यासाठी फक्त 25 लोकच उपस्थित राहू शकतात. कुठल्याही हॉलमध्ये 2 तासांच्या आत लग्नकार्य उरकावं लागणार. 

  • लोकल ट्रेनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच प्रवासाची मुभा. 50 टक्के लोकांना उभं राहून प्रवास करता येणार.

  • खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी


काय बंद असेल?



  • रेस्टॉरंट्स, बार आणि हॉटेल्स सेवा बंद असतील. 

  • रस्त्यालगत असणाऱ्या सर्व खाद्यपदार्थांची दुकाने बंद राहतील.

  • चित्रपटगृहे, नाट्यगृहे, दुकाने, मॉल, शॉपिंग सेंटर्स बंद राहतील.

  • सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे बंद राहतील.

  •  केशकर्तनालये, स्पा, सलोन, ब्युटी पार्लर्स बंद राहतील

  • शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील.

  • धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रम बंद राहतील.


राज्यात आज विक्रमी 67,438 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे.  आज 67  हजार 468 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 54 हजार 985 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 32 लाख 68 हजार 449 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत. राज्यात एकूण 6 लाख 95 हजार 747 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.15 टक्के  झाले आहे.