पालघर : सेल्फीच्या मोहाने पुन्हा एकदा घात केलाय. पालघर जिल्ह्यातील समुद्रात तब्बल 40 जणांचा जीव धोक्यात सापडला. मात्र 32 जणांचं नशिब बलवत्तर होतं. तर 3 विद्यार्थिनींना आपला प्राण गमवावा लागला. या घटनेतील 5 जण अजून बेपत्ता आहेत.


के. एल. पोंडा हायस्कूलची 40 मुलं पिकनिकसाठी समुद्राकाठी आली. तिथे महेश अंबिरे यांची बोट मुलांनी भाड्याने घेतली. समुद्रात 300 मीटरवर फेरी मारताना मुलांनी फोटोसेशनही केलं. मग वेळ आली सेल्फीची.. सेल्फीसाठी मुलं बोटीच्या एका बाजूला आली.. आणि बोटीचा बॅलन्स गेला.. यातच बोट उलटली..

वातावरण साफ होतं. घटना मच्छिमारांच्या डोळ्यादेखत घडत होती. त्यामुळे वायुवेगाने लोक मदतीसाठी पुढे धावले. तब्बल 32 मुलांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. पण तोवर दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. काही वेळानंतर आणखी एका मुलीचा मृतदेह हाती लागला.

काही मिनिटं आधी ही मुलं परत निघाली असती तर ही घटना घडलीच नसती. कारण, फेरी पूर्ण झाल्यानंतरही परतीच्या प्रवासात सेल्फीचा सोस मुलांच्या जीवावर उठला.

खरंतर 40 मुलं पिकनिकला आली, त्याची माहिती शाळा प्रशासनाला होती का? कुणाच्या जबाबदारीवर बोटमालकाने मुलांना समुद्रसफारीसाठी सोबत घेतलं? क्षमतेपेक्षा जास्त मुलांना बोटीत बसवण्यात आलं का? पालकांना या पिकनिकची कल्पना होती का? अशा अनेक प्रश्नांच्या मुळाशी आजच्या दुर्घटनेचं गुपित दडलंय. ज्याची उत्तरं पोलीस तपासातून बाहेर येतील.