पिंपरी चिंचवड : आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा कमी होतील, असं भाकित केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वर्तवलं आहे. मात्र 250 जागा मिळवून केंद्रात भाजप सत्तेत येईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. भाजपच्या जागा कमी होण्याला गुजरात आणि राजस्थानच्या निकालाचा दाखला आठवलेंनी दिला.


पिंपरी चिंचवडमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

एकबोटेंवर आठवले काय म्हणाले?

मिलिंद एकबोटेंच्या अटकेसंदर्भात आठवलेंना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, “मी सत्तेत असलो तरी माझ्या गृहखातं माझ्याकडे नाही. मात्र यातील दोषींवर कारवाई करण्याची सरकारची भूमिका आहे. त्यावेळी दगडफेक करणाऱ्यांना अटक केली आहे”

तसेच, शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेची आठवलेंनी खिल्ली उडवली. "उद्धव ठाकरे आज एक बोलले, तरी उद्या दुसरं बोलतात. त्यामुळे आज जरी ते स्वतंत्र लढू म्हणाले असतील, तरी उद्या ते विचार बदलतील", असे आठवले म्हणाले.