सांगली महापालिका निवडणुकीला पहिल्यांदाच स्वबळावर सामोरे जाणाऱ्या भाजपने शहर आणि उपनगरांच्या सर्वांगीण विकासाची हमी वचननाम्यातून दिली आहे. वचननाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असून “ लढाई अकार्यक्षमतेविरुद्ध कार्यक्षमतेची ” असा मथळा देण्यात आला आहे.
भाजपच्या वचननाम्यातील प्रमुख मुद्दे
- विकास आराखड्यानुसार शहराचा नियोजनबद्ध विकास करणार
- रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छतागृहे, महिलांसाठी स्वच्छतागृहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, अल्पदरातील वैद्यकीय सेवा, पथदिवे, क्रीडांगणे, उद्याने, मंडई, विश्रामबाग परिसरात देखणे नाट्यगृह, नाना-नानी पार्क यासारख्या पायाभूत सुविधांची उभारणी आणि अद्ययावतीकरण
- मनपा प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय आणि संवादासाठी तज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असलेल्या विविध समित्यांचे गठन
- शहराच्या प्रत्येक भागाचा समतोल विकास व्हावा, निधीचे योग्य वाटप व्हावे यासाठी नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेली नियोजन समिती स्थापणार
- महापालिका आणि व्यापारी संघटना यांची समन्वय समिती स्थापन करून औद्योगिक क्षेत्रातील पायभूत सुविधांसाठी विशेष प्रयत्न करणार
- परिसरातील औद्योगिक वसाहतीत मोठे उद्योग यावेत यासाठी प्रयत्न करणार
- महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी विशेष प्रयत्न, महिलांसाठी विशेष स्वच्छतागृहे, सार्वजनिक ठिकाणी सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन्स बसवणार
- महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगासाठी उद्योजक गटांची निर्मिती, प्रशिक्षण, अर्थसहाय्य यासाठी नगरसेविका आणि होतकरू महिलांचा समावेश असलेली विशेष सुकाणु समिती
- शहरात वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देणार
- घनकचरा व्यवस्थापनासाठी विशेष बाब म्हणून शासनाकडून 50 कोटींचा निधी उपलब्ध करून देणार
- कचऱ्यावर तांत्रिक प्रक्रियाकरून महापालिकेसाठी दरवर्षी दहा कोटींच्या उत्पन्नाची तरतूद करणार
- मनपा शाळांचे सक्षमीकरण आणि डिजिटलायजेशन करून ई लर्निंगवर भर देणार, शिक्षण विभागासाठी विशेष निधी देणार
- सीसीटीव्ही, रोड सेफ्टी बॅरिअर, व्हीएमएस बोर्ड व वायफाय सुविधांच्या माध्यमातून नागरीकांच्या सुरक्षेची काळजी घेणार
- भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी विशेष उपाययोजना राबवणार
- गुंठेवारी क्षेत्राचे नियमितीकरणासोबतच आवश्यक त्या उपाययोजना राबविणार
- चोवीस तास शुद्ध व नियमित पाणीपुरवठा
शेरीनाला प्रकल्प मार्गी लावून कृष्णा नदी व नदी पात्र स्वच्छ व सुशोभित करण्यासाठी कटीबद्ध
झोपडपट्टी पुनर्वसन, मनपाच्या आरक्षित भुखंडांचा विकास
- मोफत वा माफक दरातील आरोग्यसेवा
या जाहीरनाम्याबरोबरच गेल्या चार वर्षांत महापालिका क्षेत्रात भाजप नेत्यांनी केलेल्या कामाची जंत्रीच जनतेसमोर मांडण्यात आली आहे.