बीड : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपला घरचा आहेर दिला आहे. भाजप नेत्यांच्या पराभवामागे पक्षातील लोकांचाच हात असल्याचा पुनरुच्चार एकनाथ खडसे यांनी केला आहे. पक्षातील लोकांनीच आमच्याविरुद्ध षडयंत्र केल्याच्या आरोपावर खडसे ठाम आहेत. मात्र भाजपवर कोणतीही नाराजी नाही, असंही एकनाथ खडसेंनी सांगितलं. एकनाथ खडसे गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी परळीत गोपीनाथगडावर उपस्थित आहेत. यावेळी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.


जनता दलापासून भाजपची शेटजी-भटजींचा पक्ष अशी ओळख होती. मात्र गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, अण्णा डांगे, नितीन गडकरी अशा अनेक नेत्यांनी पक्षविस्ताराचं मोठं काम केलं. पक्षाची छवी बदलण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यानंतर शेटजी-भटजींचा पक्ष अशी ओळख असलेल्या पक्षाची ओळख बहुजन समाजाचा पक्ष अशी बनवण्यात त्यांना यश आलं. हे सगळं करताना या नेत्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं. मात्र या संघर्षानंतर भाजपला राज्यात चांगले दिवस आले. दुर्दैवाने गोपीनाथ मुंडे या चांगल्या दिवसांमध्ये आमच्यासोबत नाहीत, असं एकनाथ खडसेंनी सांगितलं.


पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांच्या पराभवामागे षडयंत्र असल्याचा आरोप खडसेंनी पुन्हा एकदा केला. मी निवडून येण्याची खात्री असताना मला पक्षाने मला तिकीट नाकारलं. तर रोहिणी खडसे इच्छूक नसताना त्यांना पक्षाने जबरदस्तीने तिकीट दिलं. गोपीनाथ मुंडे यांनी हसत-खेळत राजकारण केलं. आजच्या नेतृत्वात ते गुण दिसत नाहीत. मदत करण्याची भावना नेतृत्वात राहिली नाही, तर द्वेशाची, मत्सराची भावना आहे. ज्या लोकांना आम्ही विश्वासाने तयार केलं त्यांनी विश्वासघात केला, असा टोला एकनाथ खडसेंनी लगावला. काळ झपाट्याने बदलतो. महिनाभरात आम्ही 80 तासांचा मुख्यमंत्री पाहिला. भाजपच्या विरोधी पक्षांचा आज मुख्यमंत्री झाला. काळ किती चमत्कार करतो, हे आम्ही एका महिन्यात पाहिलं, असं एकनाथ खडसेंनी म्हटलं.


अडचणीतून मार्ग काढण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांनी वेळोवेळी मदत केली. आजची राजकारणातील परिस्थिती पाहता मुंडे साहेब सोबत असते तर ही वेळ आली नसती. सर्वात महत्त्वाचे गोपीनाथ मुंडेंनी पाठीत खंजिर खुपसण्याचं काम कधी केलं नाही, समोरासमोर लढले, विश्वासघात केला नाही. मेहनत केलेल्या लोकांवर आज अन्याय होतोय आणि अपमानही केला जात आहे, अशी भावना खडसेंनी व्यक्त केली.


VIDEO | Pankaja Munde | केंद्रात नव्हे तर राज्यातच नेत्यांची तिकिटं कापली गेली : पंकजा मुंडे