औरंगाबाद : जातीनिहाय जनगणना हवी अशी आमची मागणी असल्याचं मत औरंगाबादमध्ये बोलताना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय. गोपिनाथ मुंडे यांची गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी जातीनिहाय जनगणनेची मागणी होती. यासंदर्भात त्यांनी संसदेत वेळोवेळी प्रश्नही उपस्थित केले होते. खासदार प्रीतम मुंडे यांनीही यासंदर्भात वेळोवेळी मागणी केली आहे. त्यामुळे सध्या जनगणना जवळ आली असून ती जातीनिहाय व्हावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. तसेच या जनगणनेमुळे समाजाला न्याय देण्यास मदत होईल, असंही त्या म्हणाल्या आहेत. तसेच यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर लावण्यात आलेल्या बलात्काराच्या आरोपांबाबत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.


धनंजय मुंडे प्रकरणावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, "धनंजय मुंडे प्रकरणाचा विषय मागे पडला आहे. नैतिक, कायदेशीर आणि तात्विक दृष्ट्या या गोष्टींचे समर्थन मी करु शकत नाही. तरी अशा गोष्टीने कुटुंबाला त्रास होतो. नातं म्हणून आणि महिला म्हणून मी या गोष्टीकडे संवेदनशीलपणे पाहते. हा विषय कुणाचाही असता तरी, राजकीय भांडवल केलं नसतं आणि करणारही नाही. बाकी इतर गोष्टींचा निकाल भविष्यात लागलेच."


पाहा व्हिडीओ : धनंजय मुंडे प्रकरणावर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया



पंकजा मुंडे बोलताना म्हणाल्या की, "ओबीसा जनगणना झाली पाहिजे, ही मागणी मुंडे साहेबांनी वेळोवेळी संसदेत मांडली आहे. खासदार प्रीतम मुंडे यांनीही यासंदर्भात संसदेत आवाज उठवला आहे. अशातच आता जनगणना होणार आहे, त्यामुळे जनगणना होत असताना यासंदर्भात सकारात्मक पावलं उचलली गेली पाहिजे. जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट स्पष्ट होईल. त्यामुळे समाजाला न्याय देण्यास मदत होईल."


"ओबीसी जनगणना व्हावी ही आमची मागणी आहे. यासंदर्भात काल मी ट्वीट हिंदीत केलं होतं. त्याचा वेगळा अर्थ काही नाही. राष्ट्रीय स्तरावर काम करते म्हणून हिंदीत ट्वीट केलं, इतकाच अर्थ आहे. तसेच काल मोर्चात ओबीसी मुख्यमंत्री व्हावा असे बॅनर होते, त्याचा माझ्याशी संबंध जोडू नका.", असंही पंकजा मुंडे यांनी बोलताना स्पष्ट केलं आहे.


शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, "शेतकरी मोर्चे निघात आहेत, मात्र यासंदर्भात सरकारची चर्चेची तयारी आहे. तरीसुद्धा मोर्चे सुरुच आहेत. सरकार सकारात्मक आहे. आता यात राजकारण आहे की, अजून काय याचाही विचार केला पाहिजे."