रत्नागिरी : मुंबईतील शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यानंतर आता भाजप - शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे - प्रतिदावे केले जात आहेत. भाजपनं देखील या प्रकरणात आता शिवसेनेला थेट आव्हान देत मैदानात चितपट करण्याचं आव्हान दिलं आहे. याप्रकरणात आता दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. याबाबत भाजपचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या यांना प्रश्न विचारले असता त्यांनी थेट शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार हे गुंड सरकार असल्याचं म्हणत त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे. रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे. सध्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून देत असलेल्या आव्हान आणि प्रतिआव्हानामुळे आगामी काळात मुंबईसह राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघणार असं चित्र निर्माण झालं आहे.


'...तर जशास तसे उत्तर'


रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेवेळी किरीट सोमय्या यांच्या सोबत रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार निलेश राणे देखील हजर होते. त्यांना देखील यावेळी प्रश्न विचारण्यात आला. यावल बोलताना निलेश राणे यांनी 'याबद्दल मला जास्त काही माहिती नाही. पण, तुम्ही म्हणत आहात त्याप्रमाणे झाले असल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल' असं म्हणत पुन्हा एकदा शिवसेनेला त्यांनी आव्हान दिलं आहे. रत्नागिरी येथे पत्रकार परिषद सुरू असताना दादर येथील शिवसेना भवनासमोर राडा झाला. त्यावेळी भाजपच्या दोन्ही नेत्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आले. 


राममंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले, शिवसेना भवनाजवळ गोंधळ


'अनिल परबांना लवकरच शिक्षा'


'मातोश्री'च्या जवळचे आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी कोरोना काळात घोटाळा केला. यावेळी त्यांनी दापोली तालुक्यातील मुरूड गावच्या समुद्र किनारी नियमांचा भंग करत रिसॉर्ट उभं केलं. त्यामध्ये देखील कोटींचा आर्थिक घोटाळा आहे. मुळात साठे या जमिन मालकाकडून अनिल परब यांनी शेत जमिन खरेदी केली. मग तिथे आठच दिवसामध्ये रिसॉर्ट कसा उभा राहिला? यामध्ये सारं गौंडबंगाल आहे. मी मुळ जमिन मालक विभास साठे यांच्याशी संवाद साधला आहे. त्यांनी माझ्याकडे ज्या बिनशेती परवानग्या करण्यात आल्या त्याच्या संबंधी कोणतेही कागदपत्रं, शपथपत्र, अर्ज अथवा जबाब इत्यादींवर मी सह्या केल्या नाहीत. कुणालाही मुखत्यारपत्र दिलेले नाही अशी प्रतिक्रिया दिल्याची माहिती दिली.' यामध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना देखील शिक्षा झाली पाहिजे, अशी देखील त्यांनी मागणी केली. शिवाय जिल्हा नियोजनचा पैसा हा परब यांनी उभारलेल्या रिसॉर्टमध्ये जाण्यासाठी रस्ता तयार करण्यासाठी खर्च केल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. मी याबाबत कायदेशीर लढाई लढणार असून परब यांना शिक्षा होईल' अशा आशावाद त्यांनी बोलून दाखवला आहे. 


'हा कुठला न्याय?'


'परब यांनी बांधलेल्या रिसॉर्टच्या बांधकामावेळी सर्व नियम तोडले गेले आहेत. पण, जर सर्वसामान्य माणसानं जरा जरी नियम तोडला तर त्याच्यावर कारवाई होते. मग परब यांच्यावर का नाही? परब यांच्या रिसॉर्ट पुढे मी बांधकाम करतो, बघतो कोण तोडते ते! एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा हा कुठला न्याय?' असा सवाल यावेळी उपस्थित असलेल्या निलेश राणे यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणात अधिकारी देखील सहभागी असून त्यांच्या देहबोलीवरून ते घाबरले असल्याचं दिसत आहे असं देखील निलेश राणे यांनी म्हटलं आहे. 


Shivsena Bhavan | स्पेशल रिपोर्ट | सेना भवनासमोर शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा का झाला?