Kirit Somaiya Allegation on Anil Parab : सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र रंगल्याचं दिसत आहे. किरीट सोमय्या गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे सरकारवर नवनवी आरोपांची टीकास्त्र डागत आहेत. तसेच, उद्धव ठाकरेंचं सरकार हे गुंड सरकार असल्याचं वक्तव्यही काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी केलं होतं. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्यासह अनिल परब, किशोरी पेडणेकर यांसारख्या शिवसेना नेत्यांवरही किरीट सोमय्यांनी घोटाळ्यांचे आरोप केले आहेत. अशातच आता किरीट सोमय्यांनी आणखी एक नवं ट्वीट केलं आहे. या ट्वीटची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. 


भाजप नेते किरीट सोमय्या ट्वीटमध्ये म्हणालेत की, "आत्ता अनिल परबचाही नंबर लागणार. अनधिकृत, बेनामी रिसॉर्ट आणि रिसॉर्ट बांधकामासाठी आलेला पैसा... चौकशी होणार. भारत सरकारनं दापोली कोर्टात तक्रार दाखल केली आहे. 30 मार्च रोजी सुनावणी होणार" या आशयासह सोमय्यांनी रिसॉर्टचे दोन फोटोही शेअर केले आहेत. 



दरम्यान, काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांचं रिसॉर्ट आणि बंगला बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता. त्यावेळी सोमय्या म्हणाले होते की, "मुरुड गावात उद्धव ठाकरे यांचा उजवा हात अनिल परब यांनी बेकायदेशीररित्या रिसॉर्ट आणि बंगला बांधला आहे. ज्याची चौकशी सुरु आहे. अनिल परब यांचा बेकायदेशीर रिसॉर्ट आणि त्याचा जवळील भव्य बंगल्यावर कारवाई येत्या काही दिवसांत होणार आहे." 


किरीट सोमय्यांचा नेमका आरोप काय? 


'मातोश्री'च्या जवळचे आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी कोरोना काळात घोटाळा केला. यावेळी त्यांनी दापोली तालुक्यातील मुरूड गावच्या समुद्र किनारी नियमांचा भंग करत रिसॉर्ट उभं केलं. त्यामध्ये देखील कोटींचा आर्थिक घोटाळा आहे. मुळात साठे या जमिन मालकाकडून अनिल परब यांनी शेत जमिन खरेदी केली. मग तिथे आठच दिवसामध्ये रिसॉर्ट कसा उभा राहिला? यामध्ये सारं गौंडबंगाल आहे. मी मूळ जमिन मालक विभास साठे यांच्याशी संवाद साधला आहे. त्यांनी माझ्याकडे ज्या बिनशेती परवानग्या करण्यात आल्या त्याच्या संबंधी कोणतीही कागदपत्रं, शपथपत्र, अर्ज अथवा जबाब इत्यादींवर मी सह्या केल्या नाहीत. कुणालाही मुखत्यारपत्र दिलेले नाही, अशी प्रतिक्रिया दिल्याची माहिती दिली.' यामध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना देखील शिक्षा झाली पाहिजे, अशी देखील त्यांनी मागणी केली. शिवाय जिल्हा नियोजनचा पैसा हा परब यांनी उभारलेल्या रिसॉर्टमध्ये जाण्यासाठी रस्ता तयार करण्यासाठी खर्च केल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली असल्याची माहिती किरीट सोमय्यांनी दिली होती.