मुंबई : मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री केलं, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant patil) यांनी केलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून भाजपमधील खदखद समोर आल्याचं बोललं जात आहे. 


पनवेलमध्ये आज भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला भाजपचे अनेक नेते उपस्थित आहेत. याच बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे. "आम्ही सर्वांनी  मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला आहे. परंतु, या निर्णयामुळे आपल्याला दुःख झाले.  परंतु, एवढं मोठं दुःख पचवून आपण सर्व जण पुढे गेलो ओहोत, अशी खदखद चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवली आहे. 


चंद्रकांत पाटील म्हणाले, "मागील अडीच वर्षात राज्यात काय परिस्थिती आहे हे सर्वांनीच पाहिलं. ही परिस्थिती पाहिल्यानंतर राज्यात सत्ता बदल होण्याची गरज होती. राज्यात सत्ता बदल झालाही. सत्ता बदल होत असताना योग्य मेसेज देईल अशा व्यक्तीची गरज होती. परंतु, असे असताना देखील आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय नेतृत्वाच्या या निर्णयाचे आपल्या सर्वांना दु:ख झाले आहे. परंतु, हे दु:ख पचवून पुढे गेलो आहोत. 


चंद्रकांत पाटील म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. मुख्यमंत्री पदानंतर  त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी लागत आहे. परंतु, केंद्रीय नेतृत्वाचा आदेश त्यांनी मान्य करत उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले आहे."  


महत्वाच्या बातम्या


OBC Political Reservation : शिंदे-फडणवीस सरकारच्या पुढाकारामुळे मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाचे प्रश्नही सुटतील - चंद्रकांत पाटील 


Rajesh Kshirsagar : राजेश क्षीरसागर ज्या चंद्रकांतदादांना हिमालयात पाठवू, पाठीत खंजीर खूपसला म्हणत होते, तेच आता एकाच फलकावर झळकले!