मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून नऊ दिवस झाले आहेत. परंतु अद्याप राज्यात कोणत्याही पक्षाने सत्तास्थापन केलेली नाही. राज्यातल्या मतदारांनी महायुतीच्या बाजूने मतदान केलं आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. परंतु महायुतीचं मंत्रीपदांचं वाटप झालेलं नसल्यामुळे राज्याला अद्याप नव्या सरकारची आणि मुख्यमंत्र्यांची प्रतीक्षा आहे.


भाजपने चार दिवसांपूर्वी शिवसेनेसमोर मंत्रीपदांच्या वाटपाबात 26-13 चा प्रस्ताव ठेवला होता. (मुख्यमंत्रीपदासह 26 मंत्रीपदं भाजपला तर उपमुख्यमंत्रीपदासह 13 मंत्रीपद शिवसेनेला) तो प्रस्ताव शिवसेनेने धुडकावल्यानंतर भाजपने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमोर नवा प्रस्ताव ठेवल्याचे वृत्त 'द इंडियन एक्स्प्रेस'नं दिले आहे. त्यानुसार मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवून मंत्रीमंडळात शिवसेनेला समान वाटा देऊ, असे आश्वासन भाजपने शिवसेनेला दिले आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात भाजपने शिवसेनेला केंद्रीय मंत्रीमंडळात एक अतिरिक्त मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीद द्यावं, तसेच शिवसेनेच्या दोन ज्येष्ठ नेत्यांची राज्यपालपदी नियुक्ती करावी, अशा मागण्या शिवसेनेने भाजपसमोर मांडल्याचे एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटले आहे.

या वृत्ताबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे विचारणा करण्यात आली. त्यावर संजय राऊत त्यांच्या शैलीत म्हणाले की, शिवसेना काय बाजारात बसलेली नाही. शिवसेना स्वाभिमानी आहे, ती कोणासमोर झुकणार नाही, ती आपला हक्क घेणारच. सकाळी 10 वाजता संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत राऊत यांनी या वृत्ताचं खंडण केलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या फोनला उद्धव ठाकरेंकडून प्रतिसाद नाही : सूत्र 



निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपमध्ये मंत्रीपदांच्या वाटपाबाबत 50-50 चा फॉर्म्युला (सत्तेचं समसमान वाटप) ठरला होता, असा दावा शिवसेना नेते करत आहेत. तर मुख्यमंत्रीपदाबाबत असं काही ठरलं नव्हतं, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. दोन्ही पक्ष आपआपल्या अटींवर ठाम आहेत. दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदावर अडून बसले आहेत. त्यामुळे राज्यात अद्याप कोणीही सत्तास्थापन करु शकलेलं नाही.

भाजपच्या सगळ्या अडचणी मी समजू शकत नाही : उद्धव ठाकरे 



दरम्यान, चार दिवसांपूर्वी भाजपने शिवसेनेला एक ऑफर दिली होती, त्यानुसार भाजपने मुख्यमंत्रीपदासह 26 मंत्रिपदं स्वत:साठी ठेवत, शिवसेनेला एक उपमुख्यमंत्रीपद आणि 13 अन्य मंत्रीपदं देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, कोणत्याही स्थितीत मुख्यमंत्रीपद, गृह, अर्थ, नगरविकास आणि महसूल ही खाती देण्यात येणार नाहीत हे भाजपनं स्पष्ट केलं होतं. हा फॉर्म्युला धुडकावून लावत शिवसेना 50-50 च्या फॉर्म्युलावर ठाम राहिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपने आता शिवसेनेला नवी ऑफर दिल्याचे बोलले जात आहे.

नव्या फॉर्म्युलाबाबत संजय राऊत काय म्हणाले?



मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या नावांची चर्चा?