बेळगाव : बेळगावात कार झाडावर आदळून तिघांचा मृत्यू झाला असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या भीषण अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.


पुणे-बंगलोर महामार्गावर निपाणीजवळ आज पहाटे चार वाजता हा अपघात झाला. गोव्याहून नववर्षाचे सेलिब्रेशन करुन मुंबईला परतत असताना, कार निपाणीजवळ आल्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर कार आदळून अपघात झाला.



ही धडक एवढी जोरदार होती की कारचा चेंदामेंदा झाला. पोलिसांनी कारचा पत्रा कापून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढलं. सावित्री गुप्ता (वय 47 वर्ष), शोभा गुप्ता आणि आरती गुप्ता (वय 21 वर्ष) अशी अपघातातील मृतांची नावं आहेत. तर सावित्री गुप्ता यांचे पती, भाऊ आणि कार चालक यांची परिस्थिती गंभीर आहे.

मृत आणि जखमी मुंबईतल्या कांदिवली भागातील असल्याचं समजतं. जखमींना कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या गाडीचा क्रमांक एमएच 01 CR 5110 असा आहे.