बीड : शेतकऱ्यांचा पीक विमा भरुन घेण्यात बीड जिल्हा प्रशासनाने देशात अव्वल क्रमांक मिळवला आहे. याची दखल केंद्र सरकारने घेतली असून आज (21 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी एम. डी. सिंह आणि जिल्हा कृषी अधीक्षक एम. एल. चपळे यांचा दिल्लीतील विज्ञान भवनात सन्मान केला जाणार आहे.


या स्पर्धेमध्ये देशातील तीन जिल्ह्यांची निवड करण्यात आली. यामध्ये बीड, नांदेड आणि तमिळनाडू येथील शिवगंगा जिल्ह्यांचा समावेश आहे. 2016-14 आणि 2017-18 मध्ये सर्वाधिक विमा बीड जिल्ह्याने भरला होता आणि त्याचा लाभही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना झाला.

महसूल कर्मचाऱ्यांसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांचं पालन प्रभावीपणे झाल्यानेच ही मोहीम जिल्ह्यात यशस्वी झाली. 2016-17 मध्ये पीक विमा रक्कम भरून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती.

कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पीक विम्याचं महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगितलं होतं. शिवाय बँकेमार्फत विमा रक्कम भरून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. पीक विमा भरुन घेण्यासाठी केलेले प्रयत्न पुरस्कारासाठी महत्वाचे ठरले असून यामुळे जिल्ह्याची मान देशात उंचावणार आहे.