Chandrakant Patil : पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री (Chandrakant Patil) चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात (Banner) बॅनरबाजी करण्यात आली आहे. पुणे शहर युवक (Pune Congress) काँग्रेसच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात बॅनर लावण्यात आले आहेत. पुण्यातील कोथरुड (Kothrud) भागात लावण्यात आले आहेत. "भिकेमध्ये मिळालेला कोथरूड मतदार संघ" असा उल्लेख या बॅनरमध्ये करण्यात आला आहे. यावर काळ्या रंगाच्या बॅकग्राऊंडमध्ये त्यांचा कार्टूनसारखा फोटो बॅनरवर लावण्यात आलं आहे. शहरात कोथरुड भागातच नाही तर इतर भागात देखील असे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. 


महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असं अजब वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी काल (9 डिसेंबर) पैठणमध्ये केलं होतं. त्यावरुन राजकारण पेटताना दिसत आहे. या वक्तव्याचा निषेधार्थ पाटील यांच्याविरोधात त्यांचा फोटो विद्रूप करुन लावण्यात आला आहे.



काँग्रेसकडून घोषणाबाजी 


चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. वेगवेगळ्या शहरात कॉंग्रेसकडून निषेध व्यक्त केला जात आहे. कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. राहूल शिरसाट आणि आजित ठोकळे यांच्याकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत. 


रामदास आठवले यांच्याकडून पाठराखण


भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील नेमके काय म्हणाले माहिती नाही, पण लोकांनी शाळा चालवण्यासाठी सरकारवर अवलंबून न राहता स्वत:च्या हिमतीवर शाळा सुरु करव्यात असं त्यांना म्हणायचं असेल, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर रामदास आठवले यांनी त्यांची बाजू सावरुन घेतली आहे.


काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?


राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यांनी पैठणच्या संत पीठाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. शाळा चालू करण्यासाठी फुले, आंबेडकरांनी भीक मागितली, तुम्ही सरकारवर अवलंबून का राहता? असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. एकीकडे राज्यात महापुरुषांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे अनेकांकडून निषेध व्यक्त केला जात आहे.