भंडारा :  दसऱ्याला (Dasara) वर्षपरंपरेनुसार रावण दहनाचा कार्यक्रम देशभरात साजरा करण्यात येतो. देशभरात रावण दहनाचा (Ravan Dahan) कार्यक्रम पार पडतो. अन्याय, अहंकारी, पापी वृत्तीचे प्रतिक म्हणून रावणाचे दहन करण्यात येते. विजयादशमीच्या (Vijayadashmi) दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला असल्याची आख्यायिका आहे. त्यानुसार देशभरात हिंदू धर्मीय रावण दहनाचे कार्यक्रम आयोजित करतात. मात्र, यंदा आदिवासी बांधवांनी रावण दहनासविरोध केला असून प्रशासनाने मनाई करण्यात आली आहे. भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी हे पत्र काढले आहे. मात्र, दोन पत्रांमुळे गोंधळाची स्थिती  आहे. 


 यावर्षी आदिवासी समाज बांधवांनी या रावण दहनला प्रचंड विरोध केला आहे. रावण दहन केल्यास अनुसूचित जमाती समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. अखिल भारतीय आदिवासी परिषद,  ऑल इंडिया आदिवासी पीपल्स फेडरेशनच्या वतीनं तसं पत्र भंडारा जिल्हा प्रशासनाला दिलं आहे. 


या पत्राच्या अनुषंगाने भंडाऱ्याच्या अतिरिक्त जिल्हा न्याय दंडाधिकारी लीना फालके यांनी एक आदेश बजावला आहे. या आदेशानुसार आदिवासी महात्मा राजा रावण यांच्या पुतळ्याचे दसऱ्याच्या दिवशी दहन करणाऱ्या व्यक्ती किंवा मंडळावर गुन्हे दाखल करावे, असं या आदेशात नमूद आहे. सध्या हे पत्र समाज माध्यमावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी लीना फालके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. भंडारा आणि जवळच्या जिल्हा परिसरात मोठ्या प्रमाणावर आदिवासींची संख्या आहे. काही आदिवासी समुदायात रावणालाही पूजण्यात येते. त्यानुसार या काही जमातींमध्ये रावण दहन केले जात नाही. 


दोन पत्रांमुळे गोंधळाची स्थिती


रावण दहन केल्यास अनुसूचित जमाती समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला. त्यामुळं अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी लीना पालके यांनी 20 ऑक्टोंबरला एक पत्र काढलं. त्यात त्यांनी, आदिवासी महात्मा राजा रावण यांच्या पुतळ्याचे दसऱ्याच्या दिवशी दहन करणाऱ्या व्यक्ती किंवा मंडळावर गुन्हे दाखल करून ही दहन प्रथा बंद करावी, असं या आदेशात नमूद केलं होत. त्यानंतर हे पत्र समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झालं आणि अनेकांनी त्यांची चूक लक्षात आणून दिल्यानं, जिल्हाधिकारी कार्यालयाला त्यांची चूक लक्षात येताच, त्यांनी आज सुधारित दुसरं पत्र काढलं आहे. मात्र, या पत्रात कुठलाही आदेश नसल्यानं संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. अखिल भारतीय आदिवासी परिषद, ऑल इंडिया आदिवासी पीपल्स फेडरेशनच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना पत्र देवून रावण दहन प्रथा बंद करण्याची मागणी केली आहे.


आझाद मैदानावरील रामलीला उत्सव एक दिवस आधीच संपणार


दरम्यान, मुंबईतील आझाद मैदानावरील रामलीला उत्सव एक दिवस आधीच संपणार आहे. असा निर्णय महाराष्ट्र रामलीला मंडळाने घेतला आहे.  दसऱ्याच्या दिवशी रावण दहन न करता एक दिवस आधीच रावण दहन करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी आझाद मैदानात शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. त्या दसरा मेळाव्याकरता शिंदे गटाला मैदान देण्यात येणार आहे. या कारणास्तव रामलीला उत्सव एक दिवस आधीच संपणार आहे.  
आमच्यावर कोणाचाही दबाव नसल्याचे रामलीला मंडळाचे अध्यक्ष अशोक कुमार पांडे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आम्हांला प्रेमपुर्वक विनंती केली. त्याचा आम्ही मान ठेवत आहोत. मंडळाच्या निर्णया विरोधात जर कुणी मत मांडत अस्ल तर ते ग्राह्य धरले जाऊ नये असे आवाहनही त्यांनी केले.