मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा दक्षिण मुंबईत नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए) समोर, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटावर उभारण्याचे प्रस्तावित आहे. मात्र दक्षिण मुंबईतील जागतिक वारसा असलेल्या या ठिकाणी बाळसाहेबांचा पुतळा उभारण्यात येऊ नये, असे पत्र दक्षिण मुंबईतील काही संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.


काही दिवसांपूर्वी या पुतळ्याची जागा रिगल सिनेमासमोरुन बदलून शामाप्रसाद मुखर्जी चौकात निश्चित करण्यात आली. त्यामुळे, पुन्हा एकदा या पुतळ्यासाठी सर्व विभागांच्या परवानग्यांची प्रक्रिया सुरु आहे. परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण करुन नव्या ठिकाणी पुतळ्याच्या अनावरणासाठी आणखी वेळ अपेक्षित आहे. त्यामुळे, शिवसेनेनं ठरवल्याप्रमाणे 23 जानेवारी रोजी बाळासाहेबांच्या जयंती दिनी बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा मुहूर्त चुकण्याचीच शक्यता जास्त आहे.
दक्षिण मुंबईत बाळासाहेबांचा पुतळा का नको?

येथे पुतळा उभारल्यास येथील वाहतूक नियमनात अडथळे येतील, असे या संघटनांचे म्हणणे आहे, यासाठी पर्यायी जागा शोधावी. पर्यायी जागा मिळत नसेल तर पुतळ्याच्या उंचीबाबत पुनर्विचार करावा, अशी त्यांची मागणी आहे.

या ठिकाणी लालबहादूर शास्त्रींचाही पुतळा आहे. बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा लालबहादूर शास्त्रींच्या पुतळ्यापेक्षा मोठा असू नये अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

पत्रानुसार, दक्षिण मुंबईत जेथे बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाणार आहे; ते ठिकाण युनेस्को जागतिक वारशांच्या यादीत येते. परिणामी मुख्यमंत्र्यांनी पुतळ्यासाठी पर्यायी जागा शोधावी, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.

येथूनच गेट वे ऑफ इंडियाकडे मार्ग जात असून, येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. या कारणाने येथे पुतळा उभारण्यात येऊ नये, असेही पत्रात नमूद आहे.

पुतळ्याची जागा, उंची आणि यामुळे वाहतुकीच्या नियमनावर लक्ष ठेवण्यास अडथळे येतील, असे संघटनेचे म्हणणे आहे.

बाळासाहेब ठाकरेंचा पहिला पूर्णाकृती पुतळा तयार, उद्धव ठाकरेंकडून पाहाणी | ABP Majha



याआधी बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या निर्णयाबाबत काय काय झालं?

याआधी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील स्मारकावरुनही वाद झाले होते. आता त्यांचा दक्षिण मुंबईत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुतळाही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

याआधी बाळासाहेबांचा पुतळा गेट वे ऑफ इंडियाजवळ रिगल सिनेमासमोरील वाहतूक बेटावर बसवण्यात येणार होता. मात्र, नियोजित जागा अपुरी पडल्यानं पुन्हा पुतळ्याची जागा बदलुन ती नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए) समोर, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटावर निश्चित करण्यात आली.

आता रहिवासी संघटनांच्या विरोधामुळे ही जागा पुन्हा बदलली जाईल का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

संबंधित बातम्या :

मुंबई महापालिकेच्या पार्किंग पॉलिसीत बदल, दंडांची रक्कम कमी करुन दिलासा देण्याचा प्रयत्न
मंत्रिमंडळाच्या बैठकीत अशोक चव्हाण आणि भुजबळांमध्ये वाद, खुर्चीवरुन खटके उडल्याची चर्चा