मुंबई : मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेल्या ईद-अल-अजहा म्हणजेच बकरी ईदचा सण आज देशभरात उत्साहाने साजरा केला जात आहे. मुस्लिम समाजामध्ये कुर्बानीला मोठं महत्व असून त्यासाठीच आजचा दिवस साजरा केला जात आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार, रमजाननंतर जवळपास दोन महिन्यानंतर बकरी ईद साजरी केली जाते.  राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता गेल्या वर्षीपासून सर्व सार्वजनिक उत्सव, कार्यक्रम आणि सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले आहेत.  कोरोनाचा प्रादुर्भाव जरी कमी होत असला तरी अद्यापही धोका कायम आहे. आज 'बकरी ईद'चा सण साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मार्गदर्शक 2 जुलै रोजीच काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यात मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साधेपणाने साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. 


Eid al-Adha 2021 : आज देशात साजरी केली जातेय बकरी ईद, जाणून घ्या या दिवसाचे महत्व


बकरी ईदसाठी सरकारच्या मार्गदर्शक सूचना खालीलप्रमाणे 


1. कोरोनामुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा इदगाह किंवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता नागरिकांना आपल्या घरीच नमाज पठण करावं.
2. जनावरांचे बाजार बंद असल्याने नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने किंवा मोबाईलच्या माध्यमातून कॉल करुन जनावरे खरेदी करावीत.
3. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी. 
4. सध्या लागू असलेल्या निर्बंधामध्ये बकरी ईद निमित्ताने कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही.
5. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये.
6. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष ईदच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचेदेखील अनुपालन करावे.


राज्याच्या या मार्गदर्शक सूचना www.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत. 




 


ईदचा सण म्हणजे आनंद आणि उत्साहाचा सण होय. गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षीही ईदवर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन हा सण साजरा करण्यात यावा या अटीसह विशेष परवानगी देण्यात आली आहे. या काळात नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर आणि सॅनिटायझरचा वापर करावा असंही आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे.