यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमची मागणी मान्य केली नाही, तर मोदींचा सर्वात मोठा पुतळा यवतमाळमध्ये बनवू आणि तो उलटा लटकवायचा का ते बघू? असं म्हणत प्रहार संघटनेचे आमदार बच्च कडू यांनी मोदींना इशारा दिला आहे.


बच्चू कडू यांनी काढलेली आसूड यात्रा आज यवतमाळमध्ये पोहोचली. त्यावेळी त्यांनी ही टीका केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, शेतमालाला हमीभाव द्यावा या मागणीसाठी ही यात्रा काढण्यात आली. यावेळी बच्च कडू यांनी राज ठाकरेंवरही टीका केली आहे.

विशेष म्हणजे, नोटाबंदीच्या निर्णयावरुनही आ. बच्चू कडू यांनी पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडलं. नोटाबंदीमुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला फायदा होणार आहे का? असा प्रश्न विचारला होता. पण त्यावर नुसती आश्वासनंच मिळाली. अच्छे दिनच्या नाववरुन आमच्याकडून मतं घेऊन आमची फसवणूक केली, असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

आमदार बच्चू कडू यांनी यावेळी राज ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. राज ठाकरे काम काही करत नाहीत, पण नुसती भाषणबाजी करुन 13 आमदारांना निवडणूक आणतात. आपल्या भाषणात मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा अशी गर्जना करतात. मग महाराष्ट्रातील जनता पाकिस्तानची आहे का? असा सवाल करत त्यांच्या घोषवाक्याची खिल्ली उडवली.

दरम्यान, आमदार बच्चू कडू यांच्या आसूड यात्रेला काल मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमधून सुरुवात झाली. ही यात्रा महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यातून जाणार असून, सुमारे दीडशे सभा होणार आहेत. तर नंदुरबारमधून ही यात्रा गुजरातमध्ये प्रवेश करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहनगर असलेल्या वडनगरमध्ये 21 एप्रिल रोजी सुमारे एक हजार शेतकरी रक्तदान करुन, मोदींना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील असे धोरण आखण्याचा आवाहन करणार आहे.